water conservation : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करत मौजे आखतवाडा येथे ग्रामस्थांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी केली आहे. या उपक्रमामुळे गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, शेतीसाठी भेडसावणारे पाण्याचे संकट कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बोरगाव मंजू : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करत मौजे आखतवाडा येथे ग्रामस्थांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी केली आहे. या उपक्रमामुळे गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, शेतीसाठी भेडसावणारे पाण्याचे संकट कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जलसंधारणाच्या या महत्त्वपूर्ण कार्यात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दुष्काळसदृश परिस्थितीत पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी हा वनराई बंधारा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमामुळे इतर गावांनाही प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
या वनराई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी कृषी विभागाचे तांत्रिक मार्गदर्शन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभले. यावेळी शेतकरी श्री. रामेश्वर चिपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी विभागाकडून उपविभागीय कृषी अधिकारी विवेक बिऱ्हाडे, तालुका कृषी अधिकारी वाशीमकर, मंडळ कृषी अधिकारी बेले, तालुक्यातील उप कृषी अधिकारी देशमुख, तसेच सहायक कृषी अधिकारी वानखडे, वाकोडे, हिवाळे, बंड, बोळे, घाटोळ, राऊत व अटंमबर यांनी बंधाऱ्याच्या उभारणीसाठी तांत्रिक मार्गदर्शन केले.याशिवाय नरेंद्र महाराज गट, अकोला येथील महिलांनी मोठ्या संख्येने श्रमदान करून या उपक्रमात मोलाचे योगदान दिले.

