dry spell : पातूर तालुक्यात मागील २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आणि तूर पिके सुकू लागली असून काही भागात पिके वाळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पातूर तालुका कोरडाग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना १०० टक्के पीकविमा मंजूर करावा, तसेच तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.

फुलोऱ्यातील सोयाबीन करपले, खरीप पिके संकटात; १०० टक्के पीकविम्यासाठी शेतकरी आक्रमक
राहुल सोनोने
दिग्रस बु. : पातूर तालुक्यात मागील २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आणि तूर पिके सुकू लागली असून काही भागात पिके वाळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पातूर तालुका कोरडाग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना १०० टक्के पीकविमा मंजूर करावा, तसेच तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात सोमवारी, २४ ऑगस्ट रोजी तहसीलदारांमार्फत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळात तातडीने पीक पाहणी व सर्वेक्षण करून नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
फुलोऱ्यातील सोयाबीनचे मोठे नुकसान
सध्या सोयाबीन पीक फुलोऱ्याच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनची फुले व कळ्या गळून पडत आहेत. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कापूस, मूग, उडीद आणि तूर पिकांनाही पाण्याअभावी फटका बसत आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीपासून आतापर्यंत बियाणे, खत तसेच महागड्या कीटकनाशकांवर मोठा खर्च केला आहे. मात्र पिके हाताशी येण्याच्या काळातच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
पीकविमा मिळण्यासाठी सर्वेक्षणाची मागणी
तालुक्यात काही ठिकाणी पिके पूर्णपणे वाळण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंडळात कृषी व महसूल विभागामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे सर्वेक्षण करावे. शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
पावसाचा खंड आणखी वाढल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकतो. त्यामुळे शासनाने विलंब न करता पातूर तालुका कोरडाग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व १०० टक्के पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका
सततच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली आहे. पिकांचे नुकसान वाढल्यास शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि कोणत्याही शेतकऱ्यावर टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
श्री शेतकरी राजा ग्रुपचे रवि सोनोने, विनोद कडाळे, सचिन शेळके, सदाभाऊ घोरे, गणेश ताले, विशाल राठोड, वीरेंद्र चव्हाण, शालिग्राम राऊत, अनिल राठोड, गोपाल सोनोने आदी शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे.

