commemoration: येथील श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध शिवाचार्य महास्वामींचा ९६८ वा स्मृतीमहोत्सव ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वीरशैव धर्मीय भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

साखरखेर्ड्यात ९६८ वा स्मृतीमहोत्सव; वीरशैव बांधवांची मोठी मांदियाळी
साखरखेर्डा : येथील श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध शिवाचार्य महास्वामींचा ९६८ वा स्मृतीमहोत्सव ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वीरशैव धर्मीय भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
सकल मानवजातीच्या कल्याणासाठी उच्च व उदात्त मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या वेदागमप्रसिद्ध श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्यांनी ‘सर्वं शिवमयं जगत्’ हा समानतेचा संदेश देत वीरशैव धर्माची परंपरा दृढ केली. पंचाचार्य जगद्गुरू, प्राचीन शिवशरण तसेच धर्मगुरू शिवाचार्य यांनी शूद्र-ब्राह्मण, स्त्री-पुरुष असा उच्च-नीच भेद न करता सर्वांना समान अधिकार देणारी परंपरा देशात रुजवली.
दहाव्या शतकात या परंपरेचे उज्जयिनी सद्धर्म सिंहासनाधीश्वर १००८ श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी हे प्रभावी धर्मगुरू होऊन गेले. त्यांनी धर्मप्रचारासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. साखरखेर्डा येथे धर्मपीठाची स्थापना करून पलाश वृक्षाखाली संजीवन समाधी घेतली. धर्मप्रचाराच्या यात्रेत त्यांनी अनेक दिनदुबळ्यांचा उद्धार केला, तसेच अज्ञानी व धर्मभ्रष्ट लोकांना दिव्य उपदेशातून सन्मानाचा मार्ग दाखविला.
अशा या पलसिद्ध महास्वामींचा ९६८ वा स्मृतीमहोत्सव श्रीपु ष ब्र १०८ वेदान्ताचार्य शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येणार आहे.
तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम
३१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता नामस्मरणाने महोत्सवाचा प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजता शिवदीक्षा व गुरुमंत्र संस्कार विधी तसेच येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत करण्यात येईल. दुपारी ४ वाजता दिंडीसह पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून रात्री भक्तिसंगीताचा कार्यक्रम होईल.
१ सप्टेंबर रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीचा व संजीवन समाधीचा रुद्राभिषेक व महापूजा होईल. सकाळी ११ वाजता व्याख्यानानंतर धर्मसभा, मान्यवरांचे स्वागत व गुरुवर्यांचे आशीर्वचन होईल. त्यानंतर अध्यक्षीय समारोप व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री शिवकीर्तन व जागर होणार आहे.
२ सप्टेंबर रोजी सकाळी रुद्राभिषेक, महाप्रसाद व कीर्तन होईल. सकाळी ११ वाजता धर्मसभा, उपस्थित गुरुवर्यांचे आशीर्वचन आणि महाप्रसाद वितरणाने तीनदिवसीय स्मृतीमहोत्सवाचा समारोप होणार आहे.
या कार्यक्रमाची माहिती मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी दिली असून, महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

