42 Municipal Corporation: शहरात 15 ऑगस्टपासून महानगरपालिकेच्या 42 वातानुकुलीत बससेवा सुरू होणार आहे. या बस सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे या बससेवेचा थेट परिणाम शहरातील 14 हजार 971 प्रवासी ऑटोचालकांवर, तसेच सुमारे 3 हजार ई-ऑटो चालकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जवळपास 17 हजार चालकांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर टांगती तलवार निर्माण झाल्याची भावना ऑटोचालकांमध्ये व्यक्त होत आहे.

मनपा बससेवेच्या आगमनाने ऑटोचालकांमध्ये मात्र अस्वस्थता; 17 हजार कुटुंबांवर उपजीविकेची टांगती तलवार
आगाखान पठाण
अकोला : शहरात 15 ऑगस्टपासून महानगरपालिकेच्या 42 वातानुकुलीत बससेवा सुरू होणार आहे. या बस सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे या बससेवेचा थेट परिणाम शहरातील 14 हजार 971 प्रवासी ऑटोचालकांवर, तसेच सुमारे 3 हजार ई-ऑटो चालकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जवळपास 17 हजार चालकांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर टांगती तलवार निर्माण झाल्याची भावना ऑटोचालकांमध्ये व्यक्त होत आहे.

शासनाने प्रवासी ऑटोचे नवीन परवाने बंद केले असले, तरी प्रत्यक्षात शहरात परवानाधारक आणि बिनपरवाना ऑटोची संख्या वाढल्याचे चित्र आहे. त्यातच ई-ऑटो रिक्षांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. अशा परिस्थितीत मनपाची बससेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येवर परिणाम होऊन ऑटोचालकांच्या रोजीरोटीवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

अनेक ऑटोचालकांनी कर्ज काढून किंवा हप्त्यांवर ऑटो खरेदी केले आहेत. बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला. मात्र आता मनपाच्या बससेवेच्या पार्श्वभूमीवर हप्ते कसे भरायचे, कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा आणि रोजच्या उत्पन्नाचे काय होणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
शहरातील अनेक युवक, त्यात पदवीधरांचाही समावेश आहे, रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे ऑटोचालक म्हणून काम करत आहेत. अशा वेळी बससेवा सुरू झाल्यास त्यांच्या उत्पन्नावर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक चालकांमध्ये आतापासूनच मानसिक तणाव वाढल्याचे दिसून येत आहे.
ऑटोचालकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे आवश्यक असले तरी त्याचवेळी ऑटोचालकांच्या रोजगाराचा प्रश्नही गांभीर्याने हाताळला गेला पाहिजे. अन्यथा हजारो कुटुंबांसमोर उपजीविकेचे गंभीर संकट उभे राहू शकते. बससेवा सुरू होण्यापूर्वी शासन आणि प्रशासनाने ऑटोचालकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या पुनर्वसन, पर्यायी रोजगार किंवा आर्थिक संरक्षणाबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

