1.5 lakh smart meters : ग्राहकांना अचूक वीजबिलासह विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्यात एकूण ८७.५७ लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून त्यात महावितरणची ८५.८५ लाख मीटर बसविण्याची प्रमुख कामगिरी आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात १ लाख ५१ हजार ७७६ तर अकोला परिमंडळात सुमारे तीन लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.

अचूक बिलिंग, टीओडी सवलतीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा
बुलढाणा : ग्राहकांना अचूक वीजबिलासह विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्यात एकूण ८७.५७ लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून त्यात महावितरणची ८५.८५ लाख मीटर बसविण्याची प्रमुख कामगिरी आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात १ लाख ५१ हजार ७७६ तर अकोला परिमंडळात सुमारे तीन लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ऊर्जा क्षेत्रात व्यापक परिवर्तन सुरू असून सौर कृषी पंपांसह विविध उपक्रमांत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. स्मार्ट मीटर बसविण्यातही राज्य देशात अव्वल ठरले आहे. अकोला परिमंडळात आतापर्यंत २ लाख ९८ हजार १६३ स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून त्यात अकोला जिल्ह्यात ९१ हजार ६६४, बुलढाणा जिल्ह्यात १ लाख ५१ हजार ७७६ आणि वाशीम जिल्ह्यात ५४ हजार ७४३ मीटरचा समावेश आहे.
ग्राहकांना थेट आर्थिक लाभ
स्मार्ट मीटरमुळे शंभर टक्के अचूक बिलिंग, दर तासाला मोबाईलवर वीजवापराची माहिती, तसेच ‘टाईम ऑफ डे’ (टीओडी) सवलतीद्वारे कमी दरात वीज वापरण्याची संधी उपलब्ध होत आहे. जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या सात महिन्यांत ५४.४२ लाख घरगुती ग्राहकांना तब्बल ५१.४२ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. औद्योगिक, वाणिज्यिक व इतर ग्राहकांसह एकूण टीओडी लाभाची रक्कम २१५.३५ कोटी रुपयांवर पोहोचली असून उच्चदाब ग्राहकांना १३४९ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
देशात महाराष्ट्र अव्वल
१० फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार ८७.५७ लाख स्मार्ट मीटरसह महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बिहार (८६.४४ लाख) दुसऱ्या तर उत्तर प्रदेश (८२.७५ लाख) तिसऱ्या स्थानावर आहे.
बिलिंग तक्रारीत मोठी घट
स्मार्ट मीटरमुळे वीजवापराचे रीडिंग स्वयंचलित पद्धतीने नोंदले जात असल्याने अचूक बिल मिळत असून बिलिंग तक्रारीचे प्रमाण राज्यात केवळ अर्धा टक्क्यांवर आले आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजदर वाढतो हा गैरसमजही खोटा ठरला असून उलट वीजदर कमी करण्यासाठी नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
वितरण व्यवस्थापनाला बळ
राज्यातील सर्व ३०,१६४ फीडर व सुमारे २.८० लाख वितरण ट्रान्सफॉर्मर्सवर स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याने वीजगळती रोखणे, ऊर्जा लेखापरीक्षण करणे आणि मागणीचा अचूक अंदाज घेणे शक्य होत आहे. आगामी काळात ग्राहकांना मिळणाऱ्या सवलतीही या अचूक नोंदींवर आधारित असतील. महावितरणने स्मार्ट मीटरधारक ग्राहकांना मोबाईल ॲप डाउनलोड करून नियमित वीजवापर तपासण्याचे आवाहन केले आहे.

