₹1.75 Crore Scam in Murtizapur : कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत व्यापारी आणि शेतकऱ्यांची तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. आरोपींना अद्याप अटक न केल्याने संतप्त व्यापारी आणि शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

तीन दिवसांत कारवाई न झाल्यास २८ एप्रिलला आमरण उपोषणाचा इशारा
संजय उमक
मूर्तिजापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत व्यापारी आणि शेतकऱ्यांची तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. आरोपींना अद्याप अटक न केल्याने संतप्त व्यापारी आणि शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
या प्रकरणात सलासार ट्रेडर्सचे सुनील अग्रवाल, अलका सुनील अग्रवाल आणि केवल सुनील अग्रवाल यांच्याविरोधात फसवणुकीचे आरोप आहेत. मात्र, मुख्य आरोपी सौ. अलका अग्रवाल यांना अद्याप पोलीस प्रशासनाने अटक न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर अडत व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आज मूर्तिजापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मोर्चादरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. यानंतर आंदोलकांनी थेट आरोपी अलका अग्रवाल यांच्या घरासमोर जाऊन निदर्शने करत “आरोपींना तात्काळ अटक करा” अशी ठाम मागणी लावून धरली. दरम्यान, येत्या तीन दिवसांत मुख्य आरोपींना अटक न झाल्यास २८ एप्रिल रोजी आमरण उपोषण छेडण्याचा इशारा अडत व्यापारी व शेतकरी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मूर्तिजापुरातील या आर्थिक घोटाळ्यामुळे व्यापारी आणि शेतकरी वर्गात तीव्र संताप उसळला असून येत्या काही दिवसांत आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

