Yuva Swatantra Jyot Rally : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी बुलढाणा शहरात ‘युवा स्वतंत्र ज्योत रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये दरवर्षी या रॅलीचे आयोजन केले जाते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी केलेला त्याग, सोसलेल्या यातना आणि दिलेले समर्पण आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे, स्वातंत्र्यसैनिकांप्रती आदराची भावना निर्माण करणे तसेच युवकांमध्ये देशाप्रती कर्तव्याची जाणीव जागृत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची आठवण जागविणार; १४ ऑगस्टला बुलढाण्यात युवा ज्योत रॅली
बुलढाणा : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी बुलढाणा शहरात ‘युवा स्वतंत्र ज्योत रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये दरवर्षी या रॅलीचे आयोजन केले जाते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी केलेला त्याग, सोसलेल्या यातना आणि दिलेले समर्पण आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे, स्वातंत्र्यसैनिकांप्रती आदराची भावना निर्माण करणे तसेच युवकांमध्ये देशाप्रती कर्तव्याची जाणीव जागृत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, बुलढाणा आणि शिवराज शिक्षण संस्था, अंत्री तेली यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १६ वर्षांपासून बुलढाणा शहरात या रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी रॅली काढण्यात येणार आहे.
सायंकाळी ७ वाजता जयस्तंभ चौक, बुलढाणा येथून मान्यवरांच्या हस्ते युवा स्वतंत्र ज्योत प्रज्वलित करून रॅलीला सुरुवात होणार आहे. शहरातील मुख्य मार्गाने देशभक्तीपर घोषणांच्या गजरात ही रॅली हुतात्मा गोरे स्मारक येथे पोहोचेल. तेथे हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.
या रॅलीत बुलढाणा शहर व परिसरातील युवक, विद्यार्थी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत मान्यवर, अधिकारी, प्रशासकीय सेवेतील कर्मचारी तसेच देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, बुलढाण्याचे सचिव नरेश शेळके यांनी केले आहे.
स्वातंत्र्यसंग्रामातील बलिदान आणि देशभक्तीची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

