farmers cheated : बाळापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वाडेगाव परिसरातील शेतकऱ्यांना टरबुज बीजोत्पादन कंपनीकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी गटाने केला आहे. बीजोत्पादनासाठी करार करून रोपे देण्यात आली असली, तरी करारानुसार आवश्यक मार्गदर्शन, मशागत, मल्चिंग व फवारणीबाबत कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

करार हवेतच विरला; मार्गदर्शन मागितल्यावर कंपनी अधिकाऱ्यांकडून दमदाटीचा आरोप
राहुल सोनोने
वाडेगाव: बाळापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वाडेगाव परिसरातील शेतकऱ्यांना टरबुज बीजोत्पादन कंपनीकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी गटाने केला आहे. बीजोत्पादनासाठी करार करून रोपे देण्यात आली असली, तरी करारानुसार आवश्यक मार्गदर्शन, मशागत, मल्चिंग व फवारणीबाबत कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
वाडेगाव येथील शेतकऱ्यांना टरबुज बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत कंपनीकडून रोपे पुरविण्यात आली. मात्र पुढील टप्प्यात पिकाच्या निगा राखण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. करारात नमूद असलेल्या अटी केवळ कागदावरच राहिल्या असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास, ते मार्गदर्शन देण्याऐवजी शेतकऱ्यांनाच रागावत असल्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आर्थिक फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
याबाबत शेतकरी नितीन मनोहरराव मानकर, विष्णू मधुकरराव मानकर तसेच बाळापूर येथील मुन्नाभाई आदी शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना आपली व्यथा मांडली.
“बीजोत्पादन कार्यक्रम संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला दिला, मात्र प्रत्यक्षात कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही. प्रश्न विचारला तर उलट शेतकऱ्यांनाच रागावले जाते. परिणामी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे,” असे प्रगतशील शेतकरी नितीन एम. मानकर यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित बीजोत्पादन कंपनीवर कारवाई करावी तसेच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.शासन व कृषी विभाग याकडे लक्ष देणार का, असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.

