Mayor Kishor Garole : नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताच नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी प्रशासनाला कामाला लावत ‘ॲक्शन मोड’ दाखवून दिला आहे. सोमवारी त्यांनी औपचारिकरित्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. सकाळच्या सत्रात स्वागत समारंभ पार पडला, तर दुपारच्या सत्रात नगरपालिकेतील सर्व विभागप्रमुखांची सहविचार सभा घेऊन शहराच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

विभागप्रमुखांची सहविचार सभा; ६ ते २६ जानेवारीदरम्यान शहरव्यापी स्वच्छता अभियान
मेहकर : नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताच नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी प्रशासनाला कामाला लावत ‘ॲक्शन मोड’ दाखवून दिला आहे. सोमवारी त्यांनी औपचारिकरित्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. सकाळच्या सत्रात स्वागत समारंभ पार पडला, तर दुपारच्या सत्रात नगरपालिकेतील सर्व विभागप्रमुखांची सहविचार सभा घेऊन शहराच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीत मेहकर शहराची सद्यस्थिती, आगामी काळातील विकासकामांचे नियोजन, प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे तसेच प्रशासनाने कोणत्या दिशा निश्चित कराव्यात, यावर नगराध्यक्ष किशोर गारोळे व नगरसेवकांनी सखोल चर्चा केली. ‘काम, स्वच्छता आणि नियोजन’ या त्रिसूत्रीवर शहराच्या विकासाचा आराखडा ठरविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

याच अनुषंगाने मंगळवार, ६ जानेवारीपासून २६ जानेवारीपर्यंत मेहकर शहरात प्रभाग क्रमांक १ ते १३ पर्यंत व्यापक स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. या अभियानाची सुरुवात बालाजी सारंगधर येथील बालाजी मंदिरात दर्शन घेऊन मंदिर परिसराची साफसफाई करून करण्यात आली. आगामी दिवसांत संपूर्ण शहरातील रस्ते, नाले, सार्वजनिक ठिकाणे व वसाहती स्वच्छ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात, नगराध्यक्ष किशोर गारोळे, उद्धवसेना गटनेते विलास चनखोरे, नगरसेवक सतीश ताजने, महेश रिंढे, नितीन तुपे, रूपाली किशोर गारोळे, अन्सारी अफिया निसार अहमद, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, युवासेना तालुकाधिकारी ॲड. आकाश घोडे, संदीप गारोळे, विलास शिंदे, सुमित घोडे, अमोल मोरे यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी तसेच उद्धवसेना, युवासेना, महिला आघाडी व किसान सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ, सुंदर आणि विकासाभिमुख मेहकर घडविण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

