Thanedar Sevanand Wankhade : “विद्यार्थी मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. जीवनात संकटे येतात आणि जातात; अपयश आले तरी धीर सोडू नका. आलेल्या संधीचे सोने करा, आपली अभिव्यक्ती जपा आणि कर्तबगार बना, कारण जग कर्तबगार व्यक्तीलाच ओळखते,” असे प्रेरणादायी आवाहन ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी केले.

नाईक विद्यालयात सन्मित्र व्याख्यानमाला संपन्न
बोरगाव मंजू : “विद्यार्थी मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. जीवनात संकटे येतात आणि जातात; अपयश आले तरी धीर सोडू नका. आलेल्या संधीचे सोने करा, आपली अभिव्यक्ती जपा आणि कर्तबगार बना, कारण जग कर्तबगार व्यक्तीलाच ओळखते,” असे प्रेरणादायी आवाहन ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी केले.
ते स्थानिक परशुराम नाईक विद्यालयाच्या वतीने आयोजित एक दिवसीय सन्मित्र व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून यशाकडे वाटचाल करताना आलेले अनेक दृष्टांत कथन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. स्वर्गीय बाबासाहेब नाईक स्मृती सप्ताहानिमित्त या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष किरण नाईक होते. प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सदस्य के. एम. जोशी, मुस्ताक पटेल आदी मान्यवर होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता व लेखन कौशल्याला वाव देणाऱ्या ‘हस्तगंध’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ठाणेदार सेवानंद वानखडे आणि पत्रकार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका अध्यक्ष देवानंद मोहोड यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
व्याख्यानमालेतील “आम्हीही घडलो, तुम्हीही घडा!” या विषयावर सेवानंद वानखडे यांनी आपल्या जीवनातील अनुभव, प्रसंग आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली कथन करताना विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाध्यक्ष किरण नाईक यांनी संस्थेच्या उपक्रमांचा गौरव करताना, “आमच्या संस्थेने सेवानंद वानखडे आणि देवानंद मोहोड यांसारखे विद्यार्थी घडविले याचा अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार काढले.
शाळेची “प्रश्न विचारू, उत्तर मिळवू” ही टॅगलाइन विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली.
व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन वैष्णवी सुरते हिने केले, तर आभार प्रा. वासुदेव डांगे यांनी मानले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव एन. एस. गमे, एस. जी. बोरगावकर, सुधाकर टोपरे, शाम देशमुख, राजुमिया देशमुख, मनोज आगरकर, गजानन पोहनकर, शंकर भदे, प्रणाली अंबरते, मराठे आदींसह ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

