The wedding ceremony : लग्न म्हणजे दोन जीवांच्या आयुष्यभराच्या सहप्रवासाची पवित्र सुरुवात. हा मंगल सोहळा शुभमुहूर्तावर पार पडावा यासाठी पंचांग, तिथी आणि वेळ निश्चित केली जाते. मात्र, अलीकडच्या काळात नाचगाण्याच्या अतिरेकामुळे हा शुभमुहूर्त अक्षरशः वाऱ्यावर सोडला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी, लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मुहूर्त टाळायचाच असेल तर पंचांग काढायचंच कशासाठी?
गजानन तिडके
देऊळगाव राजा : लग्न म्हणजे दोन जीवांच्या आयुष्यभराच्या सहप्रवासाची पवित्र सुरुवात. हा मंगल सोहळा शुभमुहूर्तावर पार पडावा यासाठी पंचांग, तिथी आणि वेळ निश्चित केली जाते. मात्र, अलीकडच्या काळात नाचगाण्याच्या अतिरेकामुळे हा शुभमुहूर्त अक्षरशः वाऱ्यावर सोडला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी, लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वर-वधूच्या जन्मतारखा, ग्रहस्थिती व धार्मिक परंपरेनुसार विवाहाचा मुहूर्त ठरवण्यात येतो. हा मुहूर्त वाया जाऊ नये यासाठी प्रत्येकाने वेळेचे भान ठेवणे आवश्यक आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता “मुहूर्त पाळायचाच नसेल तर पंचांग पाहण्याचे प्रयोजन काय?” असा सवाल उपस्थित होत आहे. लग्न म्हणजे केवळ जल्लोष नव्हे, तर दोन कुटुंबांचा पवित्र आणि संस्कारयुक्त सोहळा आहे. वेळेचे पालन करणे ही जबाबदारी नसून गरज बनली आहे.
वरात की नृत्यमहोत्सव?
हल्ली वरात म्हणजे डीजेचा धिंगाणा, अमर्याद नाचगाणे आणि अंतहीन जल्लोष, असेच समीकरण झाले आहे. परंपरेनुसार वाजत-गाजत वराला मंदिरात नेऊन पूजेनंतर मंडपात आणले जाते; मात्र हीच परंपरा आता विवाह उशिरा लागण्याचे प्रमुख कारण ठरत आहे. मंदिरात जाणे-येणे हे जणू नाचण्याचे निमित्त ठरत असून, उत्साहाच्या भरात वेळेचे भान पूर्णपणे सुटते.
वऱ्हाडींच्या सहनशीलतेचा अंत
लग्नपत्रिकेत दिलेल्या वेळेनुसार वऱ्हाडी मंडळी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहतात. व्यापारी, अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, वकील तसेच लोकप्रतिनिधी यांचे वेळेचे नियोजन आखलेले असते. मात्र, विवाह वेळेवर न लागल्याने त्यांचे नियोजन कोलमडते. उन्हाळ्यातील तीव्र उकाडा, पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे वऱ्हाडींचा त्रास अधिकच वाढतो.
धावाधाव होते, पण उपयोग शून्य
वधूपक्षाकडील मंडळी विवाह वेळेत पार पडावा यासाठी धडपड करत असतात; मात्र वराकडील मंडळी अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात. काही तरुण मद्यधुंद अवस्थेत नाचत राहतात आणि वेळेचे भान राहत नाही. त्यांना वेळेवर निघण्यास सांगण्याचे धाडस कोणी करत नाही, कारण यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असते.
कोणतेही शुभकार्य करताना मुहूर्त पाहिला जातो. मात्र, सध्या विवाह सोहळ्यांमध्ये वेळेचे पालन होत नसल्याने मुहूर्त हुकत असल्याचे दिसून येते. याचा त्रास वऱ्हाडी मंडळींनाही सहन करावा लागतो. लग्नपत्रिकेत नमूद केलेल्या वेळेतच विवाह पार पडावा यासाठी वधू-वराकडील मंडळींनी पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे.
— विनायक कुलकर्णी, पंचांगतज्ज्ञ, देऊळगाव राजा

