The new bridge : सिंदखेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील जुना पूल नादुरुस्त झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी नव्या पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र हा “नवा” पूल आणि त्यावरील रस्ता अवघ्या काही काळातच खराब झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. जागोजागी तडे, खचलेला रस्ता व उघड्या धोकादायक जागा असतानाही प्रशासनाने या पुलावरून वाहतूक सुरू ठेवली असून, नागरिकांच्या जीविताशी थेट खेळ सुरू आहे.

नागरिकांच्या जीविताशी थेट खेळ — अपघात झाल्यास जबाबदार कोण?
गजानन तिडके
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील जुना पूल नादुरुस्त झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी नव्या पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र हा “नवा” पूल आणि त्यावरील रस्ता अवघ्या काही काळातच खराब झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. जागोजागी तडे, खचलेला रस्ता व उघड्या धोकादायक जागा असतानाही प्रशासनाने या पुलावरून वाहतूक सुरू ठेवली असून, नागरिकांच्या जीविताशी थेट खेळ सुरू आहे.
पुलाच्या एका बाजूची संरक्षण भिंत तुटलेली असून, त्या ठिकाणी केवळ मुरूम व दगड टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. कोणतेही लोखंडी रेलिंग अथवा कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. थोडासा तोल गेला तरी वाहन थेट नदीपात्रात कोसळू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
या पुलावरून दररोज दुचाकी, चारचाकी तसेच काही वेळा जड वाहनेही ये-जा करतात. शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, रुग्णवाहिका व ग्रामस्थ याच पुलावर अवलंबून असल्याने संभाव्य दुर्घटना व जीवितहानीचा धोका अधिकच वाढला आहे. पावसाळ्यात व पूरस्थितीत यापूर्वीही हा पूल बंद ठेवावा लागला होता, यामुळे या मार्गाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या गंभीर प्रकरणाकडे सामाजिक कार्यकर्ते गजाननभाऊ दराडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, पुलाची तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवरच राहील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
या पुलाची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. तोपर्यंत जड वाहतूक बंद करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर एखादी दुर्घटना घडल्याशिवाय हालचाल होणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

