Jalindar Budhawat : निष्ठा आणि स्वाभिमानी बाणा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वातून आपल्याला मिळालेला अमूल्य वारसा आहे. महाराष्ट्र ही संतांची आणि विचारवंतांची भूमी असून, आज स्वार्थाने बरबटलेल्या राजकारणाच्या काळातही निष्ठावंत नेतृत्वाला समाजात खरा मान आहे. शिवसेना व मातोश्रीशी निष्ठा जपणारे जालिंदर बुधवत यांच्यासारखे नेतृत्व कर्मभूमीने जपावे, असे आवाहन प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. सिद्धेश्वर आंधळे यांनी केले.
विकासकामांचा खरा पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणजे जालिंदर बुधवत : जयश्रीताई शेळके
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त कार्यकर्ता संकल्प मेळावा उत्साहात संपन्न
१०१ कार्यकर्त्यांनी रक्तदानातून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
बुलढाणा : निष्ठा आणि स्वाभिमानी बाणा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वातून आपल्याला मिळालेला अमूल्य वारसा आहे. महाराष्ट्र ही संतांची आणि विचारवंतांची भूमी असून, आज स्वार्थाने बरबटलेल्या राजकारणाच्या काळातही निष्ठावंत नेतृत्वाला समाजात खरा मान आहे. शिवसेना व मातोश्रीशी निष्ठा जपणारे जालिंदर बुधवत यांच्यासारखे नेतृत्व कर्मभूमीने जपावे, असे आवाहन प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. सिद्धेश्वर आंधळे यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मासरूळ येथे आज (दि. २३ जानेवारी) भव्य कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात व भरगच्च उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. यावेळी १०१ शिवसैनिकांनी रक्तदान करून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले. तत्पूर्वी शिवसेना, किसान सेना व युवा सेनेच्या शाखा नामफलकांचे अनावरणही करण्यात आले.

या कार्यक्रमास राज्यप्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने, समन्वयक संदीप शेळके, जिल्हा संघटक ॲड. सुमित सरदार, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, तालुकाप्रमुख विजय इतवारे, माजी सभापती सुधाकर आघाव, सरपंच मधुकर महाले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रा. सिद्धेश्वर आंधळे यांनी ओघवत्या व प्रभावी शैलीत मार्गदर्शन केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. तळागाळातील माणसाला सत्तेपर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. शिवसेना फोडण्याचे कारस्थान झाले असले तरी मराठी अस्मितेची बीजे मिटवता येणार नाहीत. निष्ठावंतांच्या बळावर शिवसेना पुन्हा नव्याने उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यप्रवक्त्या जयश्रीताई शेळके म्हणाल्या की, मासरूळ मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या भागात जालिंदर बुधवत यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. या मेळाव्यातून शिवसेनेच्या झंजावाताला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या निवडणुकांमध्ये ग्रामीण भाग शिवसेनामय करावा लागेल. विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणजे जालिंदर बुधवत असून त्यांच्या विजयाबाबत शंका नाही.

मातोश्री निष्ठेने आपले काम जोमाने सुरूच राहील : जालिंदर बुधवत
जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठदान असून त्यातून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. कृत्रिम रक्त आजतागायत तयार करता आलेले नाही, त्यामुळे रक्तदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तरुणांनी अशा पवित्र कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वावरच शिवसेना काम करत आहे. सत्ता हे ध्येय नसून समाजाच्या उत्कर्षासाठी आणि संकटसमयी धावून जाणारी संघटना म्हणजे शिवसेना आहे. मातोश्रीशी निष्ठा राखून पुढेही काम जोमाने सुरू राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित शंकरपट, जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, शाळांमध्ये खाऊ वाटप, दिव्यांग व मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी सेवा उपक्रम तसेच निराधार बांधवांसाठी स्नेहभोजन यांची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लखन गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गजानन धांडे यांनी मानले. सुमित सरदार, संदीप शेळके व डी. एस. लहाने यांनीही मार्गदर्शन केले.


