Subodh Savji :केंद्र स्तरावर घेण्यात आलेल्या ‘नीट’ वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराने आणि पेपर फुटीच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर गैरप्रकारामुळे केंद्र सरकारची मान जगात खाली गेली असून, या शैक्षणिक अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रसाद यांना तातडीने मंत्रिमंडळातून दूर करावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. यासोबतच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही आक्रमक मागणी त्यांनी केली.

डोणगाव: केंद्र स्तरावर घेण्यात आलेल्या ‘नीट’ वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराने आणि पेपर फुटीच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर गैरप्रकारामुळे केंद्र सरकारची मान जगात खाली गेली असून, या शैक्षणिक अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रसाद यांना तातडीने मंत्रिमंडळातून दूर करावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. यासोबतच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही आक्रमक मागणी त्यांनी केली.
या संदर्भातील एक सविस्तर निवेदन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाठवले आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी आपल्या निवेदनात अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. ‘नीट’ परीक्षेतील प्रचंड गोंधळ आणि त्यानंतर फेरपरीक्षेच्या घेतलेल्या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या अत्यंत तीव्र मानसिक तणावाखाली वावरत आहेत. या मानसिक त्रासाला कंटाळून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल देखील उचलले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सावजी यांनी केली. तथापि, शिक्षणमंत्र्यांनी केलेली फी माफीची घोषणा म्हणजे ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ अशी असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. देशात कुठेही विमान दुर्घटना, रेल्वे किंवा एसटी अपघात, अथवा शासकीय स्तरावर अपघात झाल्यास शासन अपघातग्रस्तांना लाखो रुपयांची मदत करते. याच धर्तीवर ‘नीट’ परीक्षेतील या घोटाळ्यामुळे देशातील २३ लाख विद्यार्थ्यांचा एकप्रकारे ‘शैक्षणिक अपघात’ झाला आहे. या अपघाताची भरपाई म्हणून केंद्र शासनाने पंतप्रधान सहायता निधीमधून प्रत्येक बाधित विद्यार्थ्याला १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पेपर फुटीच्या प्रकरणात ज्या गुन्हेगारांना शासनाने बेड्या ठोकल्या आहेत, त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी सावजी यांनी केली आहे. या गुन्हेगारांच्या मालकीची घरे शासनाने छत्रपती संभाजीनगरच्या धर्तीवर बुलडोझर लावून पाडून टाकावीत किंवा ती सर्व घरे शासनाने स्वतःच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ‘शासकीय वाचनालये’ सुरू करावीत, अशी आग्रही मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.

