Solar pump : साखरखेर्डा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने ‘मागेल त्याला सोलारपंप’ योजनेसाठी अर्ज दाखल केले; मात्र ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे कारण देत अर्ज नामंजूर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिणामी शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकून पडल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

साखरखेर्डा : साखरखेर्डा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने ‘मागेल त्याला सोलारपंप’ योजनेसाठी अर्ज दाखल केले; मात्र ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे कारण देत अर्ज नामंजूर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिणामी शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकून पडल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
शिंदी येथील अनुसया आत्माराम खरात, अशोक खरात यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात वीज वितरण कंपनीकडे अर्ज दाखल केले होते. अर्ज सादर करताना ऑनलाइन अपलोडचा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात अर्ज दिले. यावेळी प्रत्येकी ४२ हजार ९९४ रुपये ऑनलाइन भरल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र नंतर अर्जात त्रुटी असल्याचे सांगत अर्ज नामंजूर केल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त झाले.
दरम्यान, परिसरात दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, भुईमूग आदी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागत आहे. सिंदखेडराजा तालुक्यात बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण असतानाही शेतकरी जीव धोक्यात घालून शेती सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत सोलारपंप योजना दिलासा देण्याऐवजी अडथळा ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, अर्ज दाखल करतानाच ऑनलाइन प्रक्रिया आवश्यक असल्याचे स्पष्ट मार्गदर्शन मिळाले असते तर ही वेळ आली नसती. सामायिक क्षेत्रासाठी सहमतीपत्र देऊनही केवळ ऑनलाइन अर्ज न भरल्याचे कारण पुढे करून अर्ज फेटाळल्याचे सांगितले जात आहे. टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता अर्जात त्रुटी असल्याचे उत्तर देण्यात आल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांचे पैसे अडकून पडले असून यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे. सोलारपंप उपलब्ध करून देण्याचा पर्याय शोधावा, अन्यथा ज्या पद्धतीने पैसे भरले त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात परत जमा करावेत, अशी मागणी अशोक खरात यांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.

