Sit-in protest in Delgaon Raja : विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकार, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव तसेच दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी देऊळगाव राजा येथे शुक्रवारी (दि. २४ जुलै) ठिय्या आंदोलन करून निवेदन सादर केले. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत झालेल्या आंदोलनात परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा, विद्यार्थ्यांना न्याय आणि लाठीचार्ज प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदार ब्रम्हा गिरी यांना देण्यात आले.

पेपरफुटीप्रकरणी संताप; विद्यार्थ्यांचे आंदोलन, प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन
गजानन तिडके
देऊळगाव राजा : विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकार, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव तसेच दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी देऊळगाव राजा येथे शुक्रवारी (दि. २४ जुलै) ठिय्या आंदोलन करून निवेदन सादर केले. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत झालेल्या आंदोलनात परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा, विद्यार्थ्यांना न्याय आणि लाठीचार्ज प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदार ब्रम्हा गिरी यांना देण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी सादर केलेल्या निवेदनात विविध स्पर्धा परीक्षांचे निकाल तातडीने जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, निकालातील त्रुटी दूर करून सुधारित निकाल जाहीर करावा तसेच परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. या मागण्यांसाठी बस स्थानक चौकाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदन करण्यात आलेल्या ठिकाणीच नायब तहसीलदार संतोष मुंडे आणि पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले.
याशिवाय भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी पारदर्शक, विश्वासार्ह आणि शिस्तबद्ध परीक्षा प्रणाली विकसित करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेबाबत नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाचा निषेध व्यक्त करत, या घटनेची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, लाठीचार्जाचे आदेश देणाऱ्या तसेच त्याची अंमलबजावणी करणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत आणि अन्यायकारक कारवाई करणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवरही चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
तसेच आंदोलनादरम्यान गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून आर्थिक मदत व उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य जाहीर करावे, अशीही मागणी करण्यात आली.
मोर्चा शांततेत पार पडला असून, आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. निवेदन स्वीकारल्यानंतर प्रशासनाने ते शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आंदोलनकर्त्यांना सांगितले.

