Samarth Pharmacy College : श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचा शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील डी. फार्मसी अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या निकालात तब्बल २९ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च श्रेणी मिळवली, तर ७१ विद्यार्थी उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

डी. फार्मसी निकालात समर्थ कॉलेजची गगनभरारी; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गजानन तिडके
देऊळगाव राजा : श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचा शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील डी. फार्मसी अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या निकालात तब्बल २९ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च श्रेणी मिळवली, तर ७१ विद्यार्थी उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
महाविद्यालयाच्या डी. फार्मसी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून दर्जेदार शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. इंडस्ट्रियल व्हिजिट, हॉस्पिटल व्हिजिट, फार्मसी व्हिजिट, गार्बेज व्यवस्थापन प्रकल्प भेट, वॉटर प्युरिफिकेशन प्लांट भेट, शैक्षणिक सहली तसेच विविध महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभाग यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची जोड मिळत आहे.
“ध्येय ते उच्च धरावे, प्रयत्नें सिद्धीस न्यावे” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखली आहे. डी. फार्मसी द्वितीय वर्षात विद्यार्थिनी कल्याणी नागरे हिने ८६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. वैष्णवी शिंदे हिने ८५.४६ टक्के गुणांसह द्वितीय, तर योगिता घुबे हिने ८४.२७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
डी. फार्मसी प्रथम वर्षात विद्यार्थिनी जयश्री डोंगरे हिने ८६.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. शिवानी घोंगे हिने ८२.५० टक्के गुणांसह द्वितीय, तर मनोज चाटे याने ८१.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय देवानंद कायंदे यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेल्या या महाविद्यालयाला अवघी सात वर्षे पूर्ण झाली असली तरी अनुभवी प्राध्यापकवर्ग, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यामुळे महाविद्यालयाने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे, सचिव सतीश कायंदे, सहसचिव तथा आमदार मनोज कायंदे, संचालक मंडळ तसेच प्राचार्य डॉ. पी. आर. ताठे, उपप्राचार्य डॉ. जी. आर. सिताफळे, विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. कोल्हे, प्रा. एस. पी. उगले, प्रा. यु. ए. पिंपळे, प्रा. एम. एस. पिंपळे, प्रा. के. व्ही. सानप आणि सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यास कटिबद्ध राहील, अशी ग्वाही प्राचार्य डॉ. पी. आर. ताठे यांनी दिली. या प्रसंगी विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम लढ्ढा, प्रा. किशोर चर्हाटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

