gas cylinders :आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात घरगुती गॅसचा पुरवठा अपुरा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गॅस न मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, इंडियन गॅस एजन्सीसमोर सिलेंडर घेऊन लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

दुसरबीड : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात घरगुती गॅसचा पुरवठा अपुरा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गॅस न मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, इंडियन गॅस एजन्सीसमोर सिलेंडर घेऊन लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सकाळपासूनच कडक उन्हात गॅस कनेक्शनधारक सिलेंडर घेऊन रांगेत उभे राहत असून, शेतीची कामे बाजूला ठेवून गॅस मिळण्याची वाट पाहत आहेत. अनेक जण १५ ते २० किलोमीटर अंतरावरून येऊन एजन्सीसमोर तासन्तास प्रतीक्षा करत असल्याचे दिसून येत आहे.
दुसरबीड येथील राजहंस इंडियन गॅस एजन्सीकडून उपलब्धतेनुसार सिलेंडर पुरविण्याचा प्रयत्न सुरू असला तरी अपुऱ्या पुरवठ्यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी एजन्सीकडून इतरत्रून सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे प्रयत्नही केले जात असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, शासनाकडून गॅसचा तुटवडा नसल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात अनेक ग्राहकांना गॅस मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. “गॅसचा तुटवडा नसल्यास अशी परिस्थिती का निर्माण होत आहे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याशिवाय, कमी पुरवठ्यामुळे काळाबाजार होत असल्याची शंका काहींनी व्यक्त केली असून, ग्रामीण भागात या संदर्भात विविध चर्चा सुरू आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

