Mahabreaking

[breaking_news]

Pollination Halted :परागीभवन ठप्प; मासरूळ परिसरात कांदा बीजोत्पादन ४० टक्के घटण्याची भिती  

Pollination Halted :बुलढाणा तालुक्यातील मासरूळ परिसरात कांदा हे प्रमुख नगदी पीक असून, येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा बीजोत्पादन करतात. मात्र यंदा मधमाशांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याने कांदा बीजोत्पादनावर गंभीर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Pollination Halted

कीटकनाशकांचा फटका; मधमाशा गायब, शेतकरी चिंतेत

 पंडित सावळे

मासरूळ: बुलढाणा तालुक्यातील मासरूळ परिसरात कांदा हे प्रमुख नगदी पीक असून, येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा बीजोत्पादन करतात. मात्र यंदा मधमाशांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याने कांदा बीजोत्पादनावर गंभीर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

कांदा पिकामध्ये परागीभवनासाठी मधमाशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मधमाशांच्या मदतीने योग्य परागीभवन झाल्यास बीजधारणा चांगली होते आणि दर्जेदार उत्पादन मिळते. परंतु गेल्या काही वर्षांपासून कीटकनाशकांचा अतिवापर, हवामानातील अचानक बदल, अवकाळी पाऊस तसेच नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने मधमाशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

याचा थेट परिणाम कांदा पिकाच्या फुलोऱ्यावर होत असून, फुले उमलूनही अपेक्षित प्रमाणात बीजधारणा होत नाही. परिणामी उत्पादन खर्च वाढूनही शेतकऱ्यांना अपेक्षित बीजोत्पादन मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

मासरूळ, सोयगाव, वरूड, जामठी, धामणगाव, डोमरूळ, टाकळी, धामणगाव गुम्मी, तरारखेड, मढ, जनुना या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा कांदा बीजोत्पादनासाठी मोठी गुंतवणूक केली होती. मात्र मधमाशांची संख्या घटल्याने उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, मधमाशांचे संवर्धन करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर मर्यादित करणे, नैसर्गिक शेतीकडे वळणे तसेच मधमाशी पालनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शासनाने याबाबत मार्गदर्शन व मदत केल्यास कांदा बीजोत्पादनातील समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

 

“यंदा मधमाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने कांदा बीजोत्पादनावर गंभीर परिणाम होत आहे. मधमाशा आकर्षित करण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी सूर्यफुलाची लागवड केली, मात्र तरीही शेतात मधमाशा कमीच दिसत आहेत. परागीभवन नीट न झाल्यामुळे बीजधारणा घटत असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे,” अशी प्रतिक्रिया शेषराव सावळे, माजी सरपंच व कांदा बीज उत्पादक शेतकरी, मासरूळ यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top