Ural-Khurd to Lohara :तालुक्यातील उरळ खुर्द ते लोहारा या गावांना जोडणाऱ्या शेतरस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात उरळ बी.के. येथील रहिवासी श्याम घोडासकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे तक्रार करून रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

जाकीर अहमद
बाळापूर : तालुक्यातील उरळ खुर्द ते लोहारा या गावांना जोडणाऱ्या शेतरस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात उरळ बी.के. येथील रहिवासी श्याम घोडासकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे तक्रार करून रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
सदर शेतरस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे, खोल दुभंग आणि धुळीचे ढग निर्माण झाले आहेत. त्यामुळे हा मार्ग जवळजवळ वाहतुकीसाठी अयोग्य ठरला आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत असून ट्रॅक्टर, बैलगाड्या तसेच कृषी माल वाहतूक करणारी वाहने चिखलात अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
या मार्गावरून परिसरातील शेतकरी कापूस, सोयाबीन आणि विविध डाळींची वाहतूक बाजारपेठेत करतात. मात्र रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे कृषी माल मंडईपर्यंत पोहोचवताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा माल खराब होणे, विक्रीला उशीर होणे आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून गावकरी, शाळकरी विद्यार्थी आणि रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असतानाही अद्याप ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाशी जोडलेला असून शेगाव येथील गजानन महाराज संस्थानकडे जाणाऱ्या मार्गालाही जोडतो. त्यामुळे या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर श्याम घोडासकर यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना निवेदन देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाला तातडीने रस्त्याची दुरुस्ती, रुंदीकरण आणि कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याचे निर्देश द्यावेत, तसेच ड्रेनेज व्यवस्था सुधारून नियमित देखभाल सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत कृती आराखडा जाहीर करून कामाला सुरुवात करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या रस्त्याची दुरुस्ती झाल्यास बाळापूर तालुक्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

