MLA Siddharth Kharat : नाभिक समाजावर होणारी अवमानकारक वक्तव्ये, समाजाला हिणवण्याच्या घटना आणि शासन दरबारी प्रतिनिधित्वाचा अभाव या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा नाभिक महामंडळाच्या शिष्टमंडळाने मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांची भेट घेतली होती. शिष्टमंडळाच्या मागणीची दखल घेत आमदार खरात यांनी हा विषय विधिमंडळाच्या पटलावर मांडत शासनाचे लक्ष वेधले.

समाजाच्या सन्मानाचा प्रश्न सभागृहात; शिष्टमंडळाच्या मागणीची आमदारांकडून दखल
साखरखेर्डा : नाभिक समाजावर होणारी अवमानकारक वक्तव्ये, समाजाला हिणवण्याच्या घटना आणि शासन दरबारी प्रतिनिधित्वाचा अभाव या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा नाभिक महामंडळाच्या शिष्टमंडळाने मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांची भेट घेतली होती. शिष्टमंडळाच्या मागणीची दखल घेत आमदार खरात यांनी हा विषय विधिमंडळाच्या पटलावर मांडत शासनाचे लक्ष वेधले.
मार्च महिन्यात झालेल्या या भेटीत शिष्टमंडळाने नाभिक समाजाला सार्वजनिक जीवनात आणि काहीवेळा राजकीय पातळीवरही कमीपणाची वागणूक दिली जात असल्याची व्यथा मांडली. “कोणीही मनात येईल तसे विशेषण लावून समाजाला हिणवले जाते, तुच्छ लेखले जाते,” अशी भावना प्रतिनिधींनी व्यक्त केली.
या शिष्टमंडळात महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळाचे कार्याध्यक्ष दामोधर बिडवे, समाजनेते विजय गवळी, जिल्हाध्यक्ष शिवदास ढोलेकर, म. नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष महादेव ससाणे, शिवसेना नेते दत्तात्रय मोतेकर तसेच विभागीय अध्यक्ष अविनाश भुतेकर यांचा समावेश होता. त्यांनी समाजाच्या सन्मान, ओळख आणि शासकीय स्तरावरील मागण्यांची सविस्तर माहिती आमदार खरात यांच्यासमोर मांडली.
यावेळी आमदार खरात यांनी चालू अधिवेशनात हा प्रश्न निश्चितपणे उपस्थित करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी विधानभवनात हा मुद्दा मांडून समाजाच्या भावनांना न्याय दिला. यापूर्वीही त्यांनी प्रतापगडावरील वीररत्न जिवाजी महाले यांच्या स्मारकाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता.
तसेच वीररत्न जिवाजी महाले जयंती आणि संत शिरोमणी राष्ट्रसंत सेना महाराज जयंती शासनदरबारी साजरी करून त्या दिवशी शासकीय सुटी जाहीर करण्याची मागणीही आमदार खरात यांनी केली असल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले. या भूमिकेबद्दल नाभिक समाजाच्या वतीने आमदार सिद्धार्थ खरात यांचे आभार मानण्यात आले. समाजाच्या प्रश्नांना विधिमंडळात आवाज मिळणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष शिवदास ढोलेकर यांनी समाजबांधवांना आवाहन करताना सांगितले की, “गल्ली-बोळापुरते समाजकारण न करता त्याला व्यापक रूप द्या. कोणत्याही समाजाच्या उत्कर्षासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असते. नेतृत्वाला महत्त्व दिल्यासच समाज संघटित आणि दिशादर्शक बनतो.”

