Lax in Safety : तालुक्यातील आळंद परिसरात तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच हा बळी गेल्याचा संताप ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

तुटलेली तार, सुरूच प्रवाह; महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील आळंद परिसरात तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच हा बळी गेल्याचा संताप ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.
मृत शेतकरी अश्रुबा ज्ञानबा घुले (वय ५१, रा. खापरखेडा, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे असून ते गेल्या पाच ते सात वर्षांपासून आळंद येथे नातेवाईकांकडे वास्तव्यास होते. त्यांनी आळंद येथील शेती ठोका-बटई पद्धतीने घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास घुले हे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी शेतावरून गेलेली विजेची तार तुटून शेतात पडलेली होती. याची कोणतीही कल्पना नसताना त्या तारेचा स्पर्श होताच त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना आळंद फाटा येथील गणपती मंदिराजवळील शेतात घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, देऊळगाव राजा पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत तारा जमिनीच्या अगदी जवळ लोंबकळत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. अनेकदा महावितरणकडे तक्रार अर्ज देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
विशेष म्हणजे, ३१ मार्चच्या नावाखाली महावितरणकडून वीज बिल वसुलीची मोहीम जोरात सुरू असताना वीजपुरवठ्याच्या सुरक्षिततेकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. दोन विद्युत खांबांमधील तारा अनेक ठिकाणी जमिनीच्या अगदी जवळ असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.
तुटलेल्या तारेतून अजूनही विद्युत प्रवाह कसा सुरू होता? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात शोककळा पसरली असून महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

