Kharif sowing gains : मान्सूनने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर बाळापूर तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तालुका कृषी अधिकारी, बाळापूर यांनी दि. ६ जुलै २०२६ अखेर प्रसिद्ध केलेल्या पेरणी अहवालानुसार, तालुक्यात एकूण २७,००४.४० हेक्टर क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.

सोयाबीनचा वरचष्मा; बाळापूर तालुक्यात १८ हजार हेक्टरवर पेरणी
बाळापूर : मान्सूनने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर बाळापूर तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तालुका कृषी अधिकारी, बाळापूर यांनी दि. ६ जुलै २०२६ अखेर प्रसिद्ध केलेल्या पेरणी अहवालानुसार, तालुक्यात एकूण २७,००४.४० हेक्टर क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.

यामध्ये सोयाबीन हे शेतकऱ्यांचे प्रमुख पीक ठरले असून त्याची १८,३३८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यानंतर ज्वारीची ५,५६८ हेक्टर, कापूस ११३ हेक्टर, तूर ६९ हेक्टर, इतर कडधान्ये ६०.४० हेक्टर, तीळ ७ हेक्टर, तर इतर तृणधान्ये २९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. याशिवाय इतर तेलबिया पिकांची २,९३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

अहवालानुसार, यंदा ऊस (नवीन लागवड), नायजर, शेंगदाणे, मूग, उडीद तसेच इतर काही पिकांची पेरणी अद्याप झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पिकांचे योग्य व्यवस्थापन करावे, तणनियंत्रण, खतांचा संतुलित वापर तसेच कीड-रोग नियंत्रणासाठी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दिलेल्या साथीनंतर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काही दिवसांत पेरणीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

