Saral portal : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघांची स्थापना करून त्यांच्या उपक्रमांना बळकटी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे तसेच त्यांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणे आवश्यक करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाचे सर्व शाळांना निर्देश; गुणवत्ता संवर्धनावर विशेष भर
झाकिर अहमद
बाळापूर : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघांची स्थापना करून त्यांच्या उपक्रमांना बळकटी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे तसेच त्यांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणे आवश्यक करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी सभा, पुनर्मिलन समारंभ, शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याच अनुषंगाने आता SARAL पोर्टलअंतर्गत शाळा पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगिन स्तरावरून माजी विद्यार्थी संघाद्वारे आयोजित कार्यक्रम, उपक्रमांची सविस्तर माहिती व संबंधित छायाचित्रे अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी सर्व शाळांनी या सुविधेचा प्रभावी वापर करून माजी विद्यार्थी संघांच्या सर्व उपक्रमांची माहिती नियमितपणे पोर्टलवर अपलोड करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
निर्देशांनुसार शाळांनी आपल्या स्तरावर माजी विद्यार्थी संघाची स्थापना सुनिश्चित करावी. त्यांच्या बैठका, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक सहकार्य तसेच गुणवत्ता संवर्धनाशी संबंधित उपक्रमांची सविस्तर नोंद SARAL पोर्टलवर वेळेत करणे अनिवार्य राहील. यासोबतच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शिक्षण संचालकालयास सादर करणेही आवश्यक करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या मते, माजी विद्यार्थी संघांचा सक्रिय सहभाग शाळांमध्ये सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करेल. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, मार्गदर्शनाची संधी वाढेल आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होण्यास हातभार लागेल. समाज व शाळा यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

