irregular water supply : महाजल आणि जलजीवन मिशनसारख्या गाजलेल्या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही रायपूर गावातील नागरिकांना आजही थेंबाथेंबासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले असून, या प्रशासकीय अपयशाविरोधात आज संतप्त महिलांचा उद्रेक पाहायला मिळाला.

कोट्यवधींच्या योजना कागदावरच; रायपूरमध्ये पाणीटंचाईचा कहर!
बुलढाणा : महाजल आणि जलजीवन मिशनसारख्या गाजलेल्या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही रायपूर गावातील नागरिकांना आजही थेंबाथेंबासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले असून, या प्रशासकीय अपयशाविरोधात आज संतप्त महिलांचा उद्रेक पाहायला मिळाला.
दोन महिने झाले तरी नळाला पाणी नाही, आठवड्यातून एकदाही नियमित पुरवठा होत नाही, असा आक्रोश करत शेकडो महिलांनी बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी थेट जिल्हा परिषद गाठत कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात धडक दिली. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असून, घरगुती कामे, आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर महिलांनी आपल्या व्यथा मांडताना, “जर कोट्यवधी रुपये खर्च झाले असतील, तर पाणी कुठे गेले?” तसेच “योजना कुणासाठी आहेत—लोकांसाठी की कंत्राटदारांसाठी?” असे थेट सवाल उपस्थित केले.
महाजल व जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन, टाक्या आणि इतर कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवले जात असताना, प्रत्यक्षात मात्र रायपूरच्या नळांमधून कोरडी हवा येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या हलगर्जीपणामुळे महिलांना वेळ, श्रम आणि आरोग्य यांची मोठी किंमत मोजावी लागत आहे.
यावेळी महिलांनी किमान आठ दिवसाआड तरी नियमित पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, तसेच प्रशासकीय पातळीवरील रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी ठाम मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही जर गावाला पाणी मिळत नसेल, तर हा प्रश्न केवळ पाणीपुरवठ्याचा नसून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे.
गावातील पाणीपुरवठा योजनेवर दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, तरीही गेल्या तीन वर्षांपासून दोन ते तीन महिन्यांनी पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाण्यातही किडे आढळतात. आम्हाला एक ते दोन मैलांवरून पाणी आणावे लागते. टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे या योजनेचे विशेष ऑडिट करावे. तसेच आठ दिवसाआड पाणीपुरवठा करावा.
— कस्तुराबाई समाधान जाधव, रायपूरगावात विविध योजनांच्या माध्यमातून दहा कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. मात्र दहा थेंब पाणीही ग्रामस्थांना मिळाले नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कोठे खर्च झाला, याची चौकशी करावी. आमच्या गावात पाहुणे आले तर दुसऱ्या गावातून पाणी आणावे लागते. पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर झाला आहे की आम्ही अंत्यविधी सोडून मोर्चा घेऊन आलो आहोत.
— मो. फय्याज मो. एजाज, ग्रामस्थ, रायपूररायपूर गावातील पाणीपुरवठा योजनेचे वीज देयक थकल्याने कनेक्शन कापण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्य नसल्याने उपाययोजना करण्यात अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतीने पाण्याच्या टाकीसाठी जागाही दिली नाही. तसेच पाणीटंचाईसाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केले नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करावे.
— अनिल चव्हाण, प्रभारी कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा

