Mahakumbh site of Prayagraj: साखरखेर्डा येथील सनातन हिंदू युवकांनी यंदा प्रयागराज येथून पवित्र जल घेऊन १००८ किलोमीटरची कावड यात्रा सुरू केली आहे. तब्बल १००८ किलोमीटरचा पायी प्रवास करत ही कावड यात्रा श्रावण महिन्याच्या अखेरीस साखरखेर्डा येथे पोहोचणार असून, आगमनानंतर महादेव मंदिरात पवित्र जल अर्पण करण्यात येणार आहे.

पाच राज्यांचा पायी प्रवास करून कावड यात्रा साखरखेर्ड्यात दाखल होणार; हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित
साखरखेर्डा : साखरखेर्डा येथील सनातन हिंदू युवकांनी यंदा प्रयागराज येथून पवित्र जल घेऊन १००८ किलोमीटरची कावड यात्रा सुरू केली आहे. तब्बल १००८ किलोमीटरचा पायी प्रवास करत ही कावड यात्रा श्रावण महिन्याच्या अखेरीस साखरखेर्डा येथे पोहोचणार असून, आगमनानंतर महादेव मंदिरात पवित्र जल अर्पण करण्यात येणार आहे.
साखरखेर्डा येथील हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह महाराज नगरातील युवकांकडून दरवर्षी कावड यात्रेची परंपरा जपली जाते. यापूर्वी ओंकारेश्वर, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रांमधून पवित्र जल आणून महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला होता. यंदा महाकुंभासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रयागराज येथून जल आणण्याचा संकल्प युवकांनी केला.
या यात्रेसाठी २२ जुलै रोजी साखरखेर्डा येथून ४० युवक प्रयागराजकडे रवाना झाले. २४ जुलै रोजी प्रयागराज येथे पोहोचल्यानंतर २५ जुलै रोजी पवित्र जल घेऊन कावड यात्रेला प्रारंभ करण्यात आला.
यात्रेदरम्यान दररोज सुमारे ५० ते ६० किलोमीटर पायी प्रवास केला जात आहे. ही कावड यात्रा पाच राज्यांमधून प्रवास करत नागपूर मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात प्रवेशानंतर नागपूर, अमरावती, मूर्तिजापूरसह विविध शहरांमध्ये यात्रेकरूंचे स्वागत करण्यात येणार असून, अनेक ठिकाणी भोजन व विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही कावड यात्रा साखरखेर्डा येथे दाखल होणार आहे. भागावती नदीलगत असलेल्या महाकालेश्वर मंदिर परिसरात यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येईल. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात कावड यात्रा साखरखेर्डा शहरातून मार्गक्रमण करेल. या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
या कावड यात्रेचे नेतृत्व ग्रामसेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष जिवणसिंग राजपूत, माजी उपसरपंच रामदाससिंग राजपूत, उपसरपंच संग्रामसिंह राजपूत, बादलसिंग राजपूत, इंद्रपालसिंग राजपूत, पिल्लू ठाकूर आणि आशिष कामे हे करीत आहेत. सनातन परंपरा आणि धार्मिक श्रद्धेचा संगम असलेली ही यात्रा परिसरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

