Gutkha worth ₹18 lakh seized : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन आणि साखरखेर्डा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे १८ लाख ९ हजार ८१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या कारवाईत दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले असून संबंधित दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.

तुकाराम मुंढे यांच्या धडक मोहिमेचा परिणाम; दोन्ही आरोपी झाले पसार
साखरखेर्डा : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन आणि साखरखेर्डा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे १८ लाख ९ हजार ८१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या कारवाईत दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले असून संबंधित दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी सकाळी सुमारे ७ वाजता अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी पी. एस. भोपळे यांनी गुटखा साठवणुकीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या सहकार्याने कारवाई केली.
पहिल्या कारवाईत शेख ईब्रान शेख चाँद कुरेशी यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा गुटखा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत ६ लाख ७२ हजार ९११ रुपये असल्याचे सांगण्यात आले. हा गुटखा परिसरात विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला होता.
दुसऱ्या कारवाईत शेख मुस्ताक शेख खलील यांच्या निवासस्थानी धाड टाकण्यात आली. तेथे १२ प्रकारच्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. पंचनाम्यानंतर ११ लाख ४९ हजार १० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
कारवाईदरम्यान दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी पी. एस. भोपळे, ठाणेदार गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे, पोलीस उपनिरीक्षक बाजड तसेच गजानन दराडे, दिनेश बकाले, युवराज राठोड, ज्ञानदेव टेकाळे, मनोज खर्डे, रोहिदास पवार, लक्ष्मण इनामे आणि जनाबाई केवट यांनी सहभाग घेतला.
या धडक कारवाईनंतर साखरखेर्डा परिसरात खळबळ उडाली असून अनेक पानटपऱ्या आणि किराणा दुकाने काही काळ बंद राहिल्याचे दिसून आले. सकाळपासून सुरू असलेल्या या कारवाईची गावभर मोठी चर्चा होती.

