NAFED: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मागील महिन्यात पहाटेपासून रांगेत उभे राहून नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रांसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. मात्र, आज वाडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना संपर्क करून बोलावण्यात आले असता अत्यंत किचकट तपासणी प्रक्रियेच्या माध्यमातून माल खरेदी केली जात असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत.

अनेक शेतकऱ्यांचा माल परत; आर्थिक फटका वाढला
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मागील महिन्यात पहाटेपासून रांगेत उभे राहून नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रांसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. मात्र, आज वाडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना संपर्क करून बोलावण्यात आले असता अत्यंत किचकट तपासणी प्रक्रियेच्या माध्यमातून माल खरेदी केली जात असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत.
शेतकरी गेल्या चार दिवसांपासून सोयाबीनचा माल घेऊन खरेदी केंद्रावर येत आहेत. परंतु येथे माल चाळणीतून गाळून त्याची तपासणी केली जाते. त्यात १०० ग्रॅम नमुन्यावर खराब दाणे, रंगबदल, माऊचर, मातीचे प्रमाण इत्यादी बाबी तपासूनच खरेदी केली जात असल्याने अनेक शेतकऱ्यांचा माल परत पाठवला जात आहे. त्यामुळे “शासनालाच माल खरेदी करायचा नाही का?” असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
नाफेडमार्फत चांगला हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. पण माल परत पाठवला जात असल्याने शेतकरी वैतागले आहेत. “शेतकऱ्यांचा माल सरळ व सुलभ पद्धतीने घ्यावा, जेणेकरून त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही” अशी मागणी शेतकरी शुभम नेमाडे, सचिन धानोकर, अब्दुल सय्यद, अब्दुल मुस्ताक, एजाज अहमद आदींकडून होत आहे.
“आम्ही माल नाफेडवर नेला की २०-२५ प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. योग्य ठरला तरच माल घेतात, अन्यथा ‘परत न्या’ म्हणतात. त्यामुळे आम्ही प्रचंड त्रस्त झालो आहोत.”
— सागर फाळके, शेतकरी, वाडेगाव
“शासनाने किचकट प्रक्रिया ठेवून शेतकऱ्यांची थट्टा केली जाते. शेतकऱ्यांचा माल सरळ पद्धतीने खरेदी न झाल्यास शेतकरी मोर्चा काढतील.”
— राजेश्वर पळसकार, उपसरपंच, वाडेगाव

