Ex-students :महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अधिपत्याखालील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, नांद्राकोळी येथे इ.स. १९९८ च्या पाचवीच्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा शनिवार, २५ ऑक्टोबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बुलढाणा : महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अधिपत्याखालील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, नांद्राकोळी येथे इ.स. १९९८ च्या पाचवीच्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा शनिवार, २५ ऑक्टोबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इ.स. १९९३मध्ये स्थापन झालेल्या या विद्यालयातील पहिली पाचवीची बॅच म्हणून ओळख असलेल्या विद्यार्थ्यांनी आज २२ वर्षांपूर्वीच्या बालपणाच्या गोड आठवणींना उजाळा दिला. “आयुष्य किती क्षणभंगुर असते, दिवस कसे निघून जातात हे कळतही नाही,” अशा भावना व्यक्त करत सर्व माजी विद्यार्थी बालपणाच्या आठवणीत हरवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आ.अॅड. देविदास अमृता काळवाघे होते. प्रमुख पाहुणे म्हणून त्या काळातील वर्गशिक्षक आ. श्री. लहासे , तसेच मुख्याध्यापक राऊत , गवते , जोमाळकर , दांदडे , स्वप्निल काळवाघे , गायकवाड (सेवानिवृत्त), एकनाथराव काळवाघे (सेवानिवृत्त लिपिक) व जाधव मामा (कर्मचारी) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्यदेवता सरस्वती यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर शाळेची घंटा देऊन जणू शाळाच पुन्हा सुरू झाली. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा व प्रार्थना यांचा परिपाठ विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवून पार पाडला. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण बालपण उभं राहिलं, आणि विद्यालयाचा परिसर आठवणींच्या सुगंधाने दरवळला.
कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. काही जण परराज्यातून खास या प्रसंगी उपस्थित झाले. त्यापैकी प्रकाश हुडेकर (बँक मॅनेजर) विमानाने, तर निलेश खरे (उद्योजक) पुण्यावरून मोटरसायकलने येथे आले, हे त्यांचे विद्यालयावरील प्रेम अधोरेखित करणारे ठरले.शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. “आमचे विद्यार्थी समाज, शिक्षण, उद्योग, राजकारण, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रांत चमकत आहेत, हे पाहून आम्हाला अतिशय समाधान वाटते,” असे संस्थेचे अध्यक्ष काळवाघे यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना “मोठे व्हा, समाजासाठी काहीतरी करा” असा मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रमादरम्यान जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी वर्गातील तासिका, गमतीजमती व खेळ पुन्हा रंगले. मधल्या वेळेत स्नेहभोजनाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. शेवटी ‘पसायदान’ गाऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर गवते (नगररचना वर्ग-२ अधिकारी), निलेश काळवाघे (उद्योजक), सोपान हुडेकर (इंजिनीयर), अनिल काळवाघे (शिक्षक), अंकुश काळवाघे (औषध निर्माता), सिद्धू खंडागळे (प्रगतशील शेतकरी), भरत पंडित (व्यावसायिक) व इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

