DJ turn up the volume : आरोग्यासह सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या डीजेच्या आवाजासाठी शासनाने नियमावली करून दिलेली आहे. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवून विवाहासह इतर समारंभांमध्ये डीजेच्या अमर्याद आवाजामुळे कार्यकर्ते व वऱ्हाडी मंडळींच्या कानठळ्या बसत आहेत. थोर महापुरुषांची मिरवणूक असो किंवा इतर सामाजिक कार्यक्रम, डीजेचा अमर्यादित आवाज सुरूच असतो; त्यावर प्रशासन कोणतीही कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांची किमान अंमलबजावणी तरी प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

थोर महापुरुषांच्या मिरवणुकीतही डीजेचा धांगडधिंगा, नियम धाब्यावर: ग्रामीण भागातील विवाह समारंभांचा कल शहराकडे…
गजानन तिडके
देऊळगाव राजा : आरोग्यासह सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या डीजेच्या आवाजासाठी शासनाने नियमावली करून दिलेली आहे. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवून विवाहासह इतर समारंभांमध्ये डीजेच्या अमर्याद आवाजामुळे कार्यकर्ते व वऱ्हाडी मंडळींच्या कानठळ्या बसत आहेत. थोर महापुरुषांची मिरवणूक असो किंवा इतर सामाजिक कार्यक्रम, डीजेचा अमर्यादित आवाज सुरूच असतो; त्यावर प्रशासन कोणतीही कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांची किमान अंमलबजावणी तरी प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ग्रामीण भागातील विवाहसमारंभांचा कल आता गावात न होता शहरातील मंगल कार्यालयांकडे वाढत आहे. डीजेच्या तालावर तरुणाईला नाचणे-डोलणे आवडते आणि बेभान जल्लोष केला जातो; मात्र या कर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि गरोदर महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या ध्वनीमुळे धक्का सहन न झाल्याने वृद्ध व रुग्णांना त्रास होतो. ध्वनिप्रदूषणाचे परिणाम घातक असल्याने सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपक वापरावर काही निर्बंध घातले आहेत. लग्नाची वरात म्हटली की आवाजाच्या भिंती उभ्या केल्या जातात. शहरी भागात पोलिस असले तरी तेथेही नागरिकांना या आवाजाचा त्रास सहन करावा लागतो.
हळदीलाही डीजेची नवी प्रथा
सद्यस्थितीत कडाक्याच्या थंडीला हळूहळू ब्रेक लागत असून सकाळी दहानंतर वातावरणातील उष्णता वाढत आहे. त्यात लग्नसराई सुरू झाल्याने हळदीच्या कार्यक्रमातही डीजेची नवीन प्रथा सुरू झाली आहे. वरातीत कर्कश आवाजावर बेभान होऊन नाचण्याच्या प्रकारावरून भांडणे व मारामाऱ्या घडतात. त्यामुळे काही गावांनी वरातीत डीजेवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.
शासकीय नियमावली; तरी प्रशासनाचा कानाडोळा
ग्रामीण भागात सर्वत्र पोलिस बंदोबस्त नसतो आणि असला तरी दुर्लक्ष केले जाते, असा नागरिकांचा अनुभव आहे. वरातीत कार्यकर्ते व करवले बेभान अवस्थेत असतात आणि कोणाच्याही सूचना ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. आवाज कमी करण्यास सांगितल्यास वाद होण्याची शक्यता असल्याने सामान्य नागरिकांना तो त्रास निमूटपणे सहन करावा लागतो.
अशी आहे मर्यादा
पर्यावरण मंत्रालयाच्या १६ ऑगस्ट २००० च्या निर्णयानुसार ध्वनिवर्धक वापरावर निर्बंध घालण्यात आले असून डेसिबलची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे—
औद्योगिक क्षेत्र : दिवसा ७५, रात्री ७०
वाणिज्य क्षेत्र : दिवसा ६५, रात्री ५५
निवासी क्षेत्र : दिवसा ५५, रात्री ४५
शांतता क्षेत्र : दिवसा ५०, रात्री ४०
रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी आहे. शांतता क्षेत्रामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक स्थळे किंवा सक्षम प्राधिकरणाने घोषित केलेल्या क्षेत्रांचा समावेश होतो. ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.डीजेच्या तालावर तरुणाई जल्लोष करत असली तरी कर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना त्रास सहन करावा लागतो. डीजेच्या आवाजामुळे अनेक दुःखद घटना घडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रशासन, सुज्ञ नागरिक आणि कार्यकर्त्यांनी जागरूक राहून याबाबत आदर्श निर्णय घेण्याची गरज आहे.
— बळीराम मापारी, सामाजिक कार्यकर्ते, देऊळगाव राजा.

