President Draupadi Murmu : आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय ज्ञानपरंपरा जगाला स्वस्थ भविष्याची दिशा देणारी आहे. त्याचा अवलंब आणि प्रसार होत असतानाच औषधी वनस्पतींचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. हा उपक्रम केवळ शासन–प्रशासनापुरता मर्यादित न राहता लोकचळवळ व्हावा, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ
शेगाव : आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय ज्ञानपरंपरा जगाला स्वस्थ भविष्याची दिशा देणारी आहे. त्याचा अवलंब आणि प्रसार होत असतानाच औषधी वनस्पतींचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. हा उपक्रम केवळ शासन–प्रशासनापुरता मर्यादित न राहता लोकचळवळ व्हावा, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.
आयुष क्रांतीचे दर्शन: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनुभवली शेगावमधील भव्य आरोग्य प्रदर्शनी
केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथील विसावा भक्तनिवास संकुल परिसरात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते झाले.
यावेळी आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार संजय कुटे, आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा, अ. भा. आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष राकेश शर्मा, तसेच ट्रस्टचे अध्यक्ष देवेंद्र त्रिगुणा आदी उपस्थित होते.
संतुलित जीवनशैलीचा मंत्र
राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, मन आणि शरीर यांचे संतुलन साधून आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा मंत्र योग व आयुर्वेदातून मिळतो. ‘आरोग्यं परमं सुखम्’ ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. देश सशक्त बनवायचा असेल तर नागरिकांचे आरोग्य चांगले असणे अत्यावश्यक आहे. योग, आयुर्वेद, युनानी आदी आयुष पद्धती या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
आयुष मंत्रालयामार्फत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांची स्थापना, आयुष औषधालये, औषधे परीक्षण प्रयोगशाळा आणि वैश्विक पारंपरिक चिकित्सा केंद्रांचे पुनरुज्जीवन यांसारखी पावले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. औषधी वनस्पतींचे संवर्धन व क्षेत्रविस्तार यासाठीही व्यापक प्रयत्न व्हावेत, असे आवाहन त्यांनी केले.
आयुषचा व्यापक प्रसार आवश्यक
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भारतीय आहारपद्धतीतील औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा उल्लेख करत पारंपरिक जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक आहारातील अनावश्यक घटकांमुळे आजार वाढल्याचे दिसते, त्यामुळे आयुर्वेद व आयुष पद्धतींचा अधिक व्यापक प्रसार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, निरामय जीवनशैली, ‘वेलनेस’ आणि ‘समग्र स्वास्थ सुरक्षा’ ही आयुषची आधारशिला आहे. औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल. महाराष्ट्रात स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापनेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. विदर्भ व महाराष्ट्रातील गरजूंना आयुष उपचारपद्धतीचा लाभ मिळावा यासाठी शेगाव येथे हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. आयुर्वेद क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ वैद्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये
देशातील प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची विनामूल्य आरोग्य तपासणी व आयुष पद्धतीने औषधोपचार
विविध आयुष औषध उत्पादक कंपन्या, सरकारी संस्था, संशोधन केंद्रे व नामांकित महाविद्यालयांचे माहितीपर कक्ष
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (नागार्जुन वनौषधी उद्यान) यांच्या सौजन्याने दुर्मिळ वनौषधींचे प्रदर्शन व शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा
आयुष चिकित्सा पद्धतीवर विद्यार्थी, डॉक्टर व नागरिकांसाठी माहितीपूर्ण व्याख्याने

