Census Preparations Complete: जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची महाराष्ट्रात तयारी सुरू झाली असून या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले आहे.

देऊळगाव राजा : जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची महाराष्ट्रात तयारी सुरू झाली असून या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले आहे.
जनगणना ही केवळ सांख्यिक माहिती गोळा करण्याची प्रक्रिया नसून, देशाच्या विकास नियोजनाचा आणि शासनाच्या धोरणनिर्मितीचा महत्त्वाचा पाया मानली जाते. या पार्श्वभूमीवर जनगणनेचा पहिला टप्पा दोन प्रमुख भागांत राबविण्यात येणार आहे. स्व-गणना प्रक्रिया १ ते १५ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. या टप्प्यात नागरिकांना स्वतःची तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. ही सुविधा मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात आली असून मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येईल.
यानंतर घरगणना हा दुसरा टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात प्रत्येक घराची प्रत्यक्ष तपासणी करून आवश्यक माहिती संकलित केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व अचूक पद्धतीने पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.
नागरिकांनी वेळेत व योग्य पद्धतीने आपली माहिती भरून या राष्ट्रीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

