A horrific accident : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारचा भीषण अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कारंजा–मूर्तिजापूर मार्गावरील मुरंबा फाट्याजवळ घडली. मृत व जखमी सर्वजण कारंजा तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

मुरंबा फाट्याजवळील घटना, मृतक कारंजा तालुक्यातील
कारंजा : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारचा भीषण अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कारंजा–मूर्तिजापूर मार्गावरील मुरंबा फाट्याजवळ घडली. मृत व जखमी सर्वजण कारंजा तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
कारंजा येथील सहा जण एमएच ३६ झेड ०९०९ क्रमांकाच्या कारने मूर्तिजापूरहून कारंजाकडे येत असताना मुरंबा फाट्याजवळ अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या सुरक्षाभिंतीवर जोरदार आदळून पलटी झाली आणि भीषण अपघात घडला.
या अपघातात रोहित भगवानदास रिल (वय २५, रा. वाल्मिक नगर, कारंजा) व संकेत मेश्राम (वय २५, रा. गवळीपुरा, कारंजा) हे दोघे गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. तर यशवंत घनश्याम राठोड (वय ३१, रा. कारंजा), आर्यन अमोल अंभोरे (वय १९, रा. कारंजा), ओम दीपक मुंदे (वय १९, रा. कारंजा) आणि अक्षय संजय रोकडे (वय २७, रा. दादगाव) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून सर्व जखमींना मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी रोहित रिल व संकेत मेश्राम यांना मृत घोषित केले. उर्वरित चार जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बाहेरगावी हलविण्यात आले आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

