Mahabreaking

[breaking_news]

Soybean crop : सोयाबीनवर अळीचा हल्ला; शेतकरी औषधांच्या शोधात, कृषी विभागाचे मार्गदर्शन मात्र बांधावर पोहोचेना!

Soybean crop : यंदा पावसाने काहीसा दिलासा दिल्याने सिंदखेडराजा तालुक्यासह साखरखेर्डा परिसरात सोयाबीनचे पीक जोमाने बहरले आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करून फवारणी करीत आहेत. मात्र, पिकावर नेमकी कोणत्या प्रकारच्या अळीचा प्रादुर्भाव आहे, तिची अवस्था कोणती आहे आणि त्यावर कोणते कीटकनाशक प्रभावी ठरेल, याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

Soybean crop

अळीचा प्रादुर्भाव अन् महागडी औषधे; सिंदखेडराजा तालुक्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात

साखरखेर्डा  : यंदा पावसाने काहीसा दिलासा दिल्याने सिंदखेडराजा तालुक्यासह साखरखेर्डा परिसरात सोयाबीनचे पीक जोमाने बहरले आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करून फवारणी करीत आहेत. मात्र, पिकावर नेमकी कोणत्या प्रकारच्या अळीचा प्रादुर्भाव आहे, तिची अवस्था कोणती आहे आणि त्यावर कोणते कीटकनाशक प्रभावी ठरेल, याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

सिंदखेडराजा तालुक्यात यंदा सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. जून महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावल्यानंतर पेरणीला वेग आला आणि बहुतांश शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण केली. जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी असतानाही शेतकऱ्यांनी निसर्गाशी दोन हात करीत पेरणी केली. त्यानंतर जुलैमध्ये झालेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना पोषक वातावरण मिळाले. परिणामी सोयाबीनची वाढही चांगली झाली.

शेतकऱ्यांनी निंदणी, डवरणी आदी मशागतीची कामे वेळेत करून पिकांची योग्य निगा राखली. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, आता सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी

अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने परिसरातील कृषी सेवा केंद्रांवर कीटकनाशके खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. आर्थिक अडचणी असतानाही पीक वाचविण्यासाठी काही शेतकरी उधारीवर औषधे खरेदी करून फवारणी करीत आहेत.

मात्र, केवळ औषध विक्रेत्यांच्या सल्ल्यावर फवारणी करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. अळीची नेमकी ओळख, तिची अवस्था, आर्थिक नुकसान पातळी आणि योग्य कीटकनाशक याबाबत कृषी विभागाकडून शास्त्रीय मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.

कृषी विभागाने बांधावर पोहोचण्याची गरज

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या कृषी सहाय्यक व कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे. तालुक्यात कोणत्या पिकाची किती लागवड झाली, कोणत्या भागात कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आहे आणि त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याची माहिती शेतकऱ्यांना वेळेत मिळणे गरजेचे आहे.

काही कृषी सेवा केंद्र चालकांकडून योग्य सल्ला दिला जात असला तरी काही ठिकाणी गरजेपेक्षा महागडी औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना आवश्यक त्या औषधांची शिफारस करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, तणनाशकांच्या फवारणीनंतर काही ठिकाणी पिकांवर विपरीत परिणाम झाल्याच्या तक्रारीही शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे कोणतेही औषध वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांचा सवाल : अधिकारी बांधावर कधी येणार?

पाऊस, पेरणी, मशागत आणि उत्पादनाच्या आशेने आधीच आर्थिक जोखीम घेतलेल्या शेतकऱ्यांसमोर आता अळीच्या प्रादुर्भावाचे नवे संकट उभे ठाकले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे खरेदी करण्याची वेळ आली असताना कृषी विभागाने केवळ कार्यालयीन पातळीवर सूचना न देता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top