Three deaths in Shindi : येथून जवळच असलेल्या शिंदी गावात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. या तिघांवरही अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दोन हृदयविकाराने, एकाचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू; शिंदी गाव शोकसागरात
साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या शिंदी गावात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. या तिघांवरही अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिंदी येथील गुलाबराव माधवराव खरात (वय ७८) यांना काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच ९ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
ही घटना ताजी असतानाच त्याच दिवशी रात्री शिंदी येथील ताराबाई भिकनसिंग राजपूत (वय ७९) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सलग दुसऱ्या निधनाच्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली.
याच दु:खातून गाव सावरत नाही तोच शुक्रवारी, १० जुलै रोजी आणखी एक धक्कादायक घटना घडली. शिंदी येथील सधन कास्तकार भुजंगराव बाजीराव खरात (वय ७०) यांचे एसटी बसमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते आठवडी बाजारासाठी शुक्रवारी दुपारी चिखली–साखरखेर्डा बसने साखरखेर्ड्याकडे निघाले होते. प्रवासादरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली. बसचे चालक-वाहक आणि सहप्रवाशांनी तत्परता दाखवत त्यांना साखरखेर्डा येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विशाल मगर यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
भुजंगराव खरात यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. गुलाबराव खरात यांच्या पश्चात तीन भाऊ, चार बहिणी, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. तर ताराबाई राजपूत यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. अवघ्या एका दिवसात गावातील तिन्ही व्यक्तींच्या निधनाच्या घटनांमुळे शिंदी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

