Let us teach: बीएलओची कामे, टीईटीची अनिवार्यता, पदोन्नतीतील जाचक अटी आणि अशैक्षणिक जबाबदाऱ्यांच्या वाढत्या ओझ्याविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षकांनी गुरुवार, ९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधून शेकडो शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.

बीएलओच्या कामाचा संताप; बुलढाण्यात शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बुलढाणा : बीएलओची कामे, टीईटीची अनिवार्यता, पदोन्नतीतील जाचक अटी आणि अशैक्षणिक जबाबदाऱ्यांच्या वाढत्या ओझ्याविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षकांनी गुरुवार, ९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधून शेकडो शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन उभारले. शहरातील जिजामाता संकुल येथून मोर्चाला सुरुवात झाली. संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

‘शिक्षण वाचवा, शाळा वाचवा, देश वाचवा’, ‘बीएलओच्या कामातून शिक्षकांना मुक्त करा’, ‘टीईटी अनिवार्यता रद्द करा’, ‘पदोन्नतीतील अन्यायकारक अटी मागे घ्या’, ‘संचमान्यतेचे चुकीचे धोरण रद्द करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शासनाने शिक्षकांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.
मोर्चात सहभागी शिक्षकांनी शासनाच्या धोरणांवर तीव्र टीका केली. शैक्षणिक कामांव्यतिरिक्त बीएलओ, एसआयआर, आधार पडताळणी, संचमान्यता यांसारखी अशैक्षणिक कामे शिक्षकांवर लादली जात असल्याने अध्यापनावर परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “आम्हाला शिकवू द्या, मुलांना शिकू द्या” असे फलक घेऊन शेगाव तालुक्यासह विविध भागांतील शिक्षक मोठ्या संख्येने आंदोलनात उतरले होते.
एका शिक्षिकेने माध्यमांशी बोलताना, “गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे; मात्र सततच्या अशैक्षणिक कामांमुळे वर्गात पुरेसा वेळ देता येत नाही. पालक जाब विचारतात, पण शिक्षकांना शिक्षणाऐवजी इतरच कामांत अडकवले जाते,” अशी खंत व्यक्त केली. समाजातील बेरोजगारांना मानधनावर ही कामे देता येऊ शकतात; मात्र शिक्षकांवरच सर्व जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
टीईटी अनिवार्यतेवरही शिक्षकांनी संताप व्यक्त केला. “टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सेवेतून निवृत्त करण्याची भाषा शासन करत असेल, तर शिक्षकांना पेन्शन द्यावी. पाच वर्षे आमदार-खासदार राहणाऱ्यांना पेन्शन मिळते, मग शिक्षकांना का नाही?” असा सवाल एका शिक्षिकेने उपस्थित केला.
या आंदोलनासाठी अनेक शिक्षकांनी रजा टाकली, तर काहींनी सकाळची शाळा आटोपून बुलढाणा गाठले. काही ठिकाणी शाळा बंद ठेवूनही शिक्षक मोर्चात सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले. शासनाच्या निर्णयांमुळे शिक्षकांवरील ताण वाढत असून, शिक्षण व्यवस्थेवर त्याचे दुष्परिणाम होत असल्याचा आरोप करत शिक्षकांनी एकीचे बळ दाखवत आंदोलनाची ताकद बुलढाण्यातूनही सरकारपर्यंत पोहोचवली.

