Farmers launch: परिसरातील सिंचन व्यवस्थेतील अडचणी दूर करून शेतीसाठी नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी मासरूळ येथील शेतकऱ्यांनी पद्मावती धरण तसेच कालव्यांच्या दुरुस्तीची मागणी लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे. यासंदर्भात जलसंधारण व लघु पाटबंधारे विभागाचे सचिव एकनाथराव डवले यांना निवेदन सादर करण्यात आले.

सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर; मासरूळच्या शेतकऱ्यांची धरण दुरुस्ती व गाळ काढण्याची मागणी
पंडीत सावळे
मासरूळ : परिसरातील सिंचन व्यवस्थेतील अडचणी दूर करून शेतीसाठी नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी मासरूळ येथील शेतकऱ्यांनी पद्मावती धरण तसेच कालव्यांच्या दुरुस्तीची मागणी लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे. यासंदर्भात जलसंधारण व लघु पाटबंधारे विभागाचे सचिव एकनाथराव डवले यांना निवेदन सादर करण्यात आले.
मासरूळ येथील पद्मावती धरणाच्या पाणी वापर संस्थेमार्फत सिंचनाचे नियोजन आणि विविध बांधकामांची देखभाल केली जाते. मात्र, धरणातील गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली असून कालवे व पाटांची दुरवस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात धरणातील साचलेला गाळ तातडीने काढून पाणी साठवण क्षमता वाढविणे, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, पाझर तलाव आणि सिमेंट नाला बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, तसेच कालवे आणि पाटांचे मजबुतीकरण करून त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या कामांमुळे सिंचनासाठी सुरळीत व नियमित पाणीपुरवठा होऊन परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. ही मागणी अरुणभाऊ तायडे (जामठी) यांच्या माध्यमातून पुढे रेटण्यात आली.
निवेदन सादर करताना माजी सरपंच शेषराव सावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरिभाऊ सिनकर, ग्रामपंचायत सदस्य पती नंदकिशोर देशमुख, अरुणभाऊ भोसले, विश्वदीप पडोळे यांच्यासह मासरूळ, डोमरूळ आणि धामणगाव परिसरातील अनेक शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी सचिव एकनाथराव डवले यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

