Child marriage thwarted : तालुक्यातील अंजणी बुद्रुक येथे होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला यश आले आहे. वेळेत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचा ठोस संदेश समाजात गेला आहे.

डायल 112 वरील माहिती ठरली निर्णायक; बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश
डोणगाव : तालुक्यातील अंजणी बुद्रुक येथे होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला यश आले आहे. वेळेत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचा ठोस संदेश समाजात गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजता डोणगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार गोविंद खंडागळे यांना डायल ११२ वरून गोपनीय माहिती प्राप्त झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजंठा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह अंजणी बुद्रुक येथील युवकासोबत होत असल्याची माहिती त्यांना मिळाली.
ही माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन बुलढाणाचे पर्यवेक्षक सागर नरवडे यांनीही प्रशासनाला दूरध्वनीद्वारे माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या.
बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी योगेंद्र गुलाबराव बचाटे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तात्काळ विवाहस्थळी धाव घेतली. तेथे सुरू असलेला विवाहसोहळा कायदेशीर प्रक्रियेनुसार थांबविण्यात आला. चौकशीदरम्यान संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली.
मुलगी ही काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या श्रेणीत येत असल्याने तिच्या नातेवाईकांसह तिला पुढील आदेशासाठी बाल कल्याण समिती, बुलढाणा यांच्यासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी महिला पोलीस कॉन्स्टेबल शालू गिऱ्हे यांच्या सोबत तिला सुरक्षितपणे रवाना करण्यात आले.
ही कारवाई डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी कुंडलिक वाळले, महिला पोलीस कॉन्स्टेबल शालू गिऱ्हे तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली.
या घटनेमुळे बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्या घटकांमध्ये खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलींचे संरक्षण आणि बालविवाह निर्मूलनासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

