Safety fences missing : गोहोगाव शिवारातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक जाळ्या (फेन्सिंग) आणि त्यांचे लोखंडी अँगल गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्यांनी हे साहित्य चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यामुळे वन्यप्राणी थेट महामार्गावर येण्याचा धोका वाढला आहे.

गोहोगाव शिवारात सुरक्षेला तडा; समृद्धी महामार्गावरील फेन्सिंग चोरीला?
डोणगाव : गोहोगाव शिवारातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक जाळ्या (फेन्सिंग) आणि त्यांचे लोखंडी अँगल गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्यांनी हे साहित्य चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यामुळे वन्यप्राणी थेट महामार्गावर येण्याचा धोका वाढला आहे.
समृद्धी महामार्ग हा अतिवेगवान मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावरून वाहने ताशी १२० किलोमीटर किंवा त्याहून अधिक वेगाने धावत असतात. वनक्षेत्र आणि शिवारालगतचा हा मार्ग असल्याने वन्यप्राण्यांचा महामार्गावर प्रवेश रोखण्यासाठी दोन्ही बाजूंना मजबूत लोखंडी जाळ्यांचे संरक्षक कुंपण उभारण्यात आले आहे.
मात्र, गोहोगाव शिवारातील महामार्गालगतच्या अनेक ठिकाणी हे अँगल आणि जाळ्या गायब झाल्याचे दिसून येत आहे. या परिसरात हरिण, नीलगाय आणि रानडुकरांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याने वन्यप्राणी सहजपणे महामार्गावर येऊ शकतात. अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर अचानक वन्यप्राणी आल्यास भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महामार्गाच्या सुरक्षेसाठी चोवीस तास गस्त घालणारी यंत्रणा कार्यरत असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संरक्षक जाळ्यांचे अँगल गायब कसे झाले, असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि वाहनचालक उपस्थित करीत आहेत. आर्थिक फायद्यासाठी चोरट्यांनी हे साहित्य लंपास केल्याचा संशय व्यक्त होत असून, संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
नागरिकांची मागणी
या प्रकाराची तात्काळ चौकशी करून ज्या ठिकाणी संरक्षक जाळ्या आणि अँगल गायब झाले आहेत, तेथे नवीन साहित्य बसविण्यात यावे. तसेच महामार्गाच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाकडे प्रश्न
समृद्धी महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस प्रशासन या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणार का, की एखाद्या मोठ्या अपघातानंतरच हालचाल करणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्गावरील सुरक्षाव्यवस्थेतील ही त्रुटी त्वरित दूर न केल्यास भविष्यात गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

