MNS takes an aggressive :शहराच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या सावखेड भोई वेश, जाफराबाद वेश, गिरोली वेश आणि गढी वेश या चार ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देत या वेशींच्या तात्काळ दुरुस्ती व संवर्धनाची मागणी केली असून, दुर्लक्ष झाल्यास तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

देऊळगाव राजाचा ऐतिहासिक वारसा धोक्यात; मनसे विद्यार्थी सेनेचे नगर परिषदेला निवेदन
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहराच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या सावखेड भोई वेश, जाफराबाद वेश, गिरोली वेश आणि गढी वेश या चार ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देत या वेशींच्या तात्काळ दुरुस्ती व संवर्धनाची मागणी केली असून, दुर्लक्ष झाल्यास तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मनविसेचे शहराध्यक्ष आकाश डोळस यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात या चारही वेशी राजे लाखुजीराव जाधव यांच्या काळातील ऐतिहासिक वारसा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र सध्या या वास्तू अत्यंत जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत, बांधकाम खचत आहे तसेच झाडे-झुडपे वाढल्याने संरचनेला धोका निर्माण झाला आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर उदासीनतेचा आरोप करत, यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने मागितलेली सर्व कागदपत्रे वेळेत सादर करूनही संवर्धनाच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मनसेने चारही वेशींची तात्काळ तांत्रिक पाहणी, पुरातत्त्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संवर्धन आराखडा तयार करणे, आवश्यक निधी उपलब्ध करून दुरुस्तीची कामे सुरू करणे तसेच आजपर्यंत झालेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल जनतेसमोर सादर करण्याची मागणी केली आहे.निवेदनावर मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद राजे जाधव, तालुकाध्यक्ष बंडू राजे डोळस, शहराध्यक्ष नवनाथ रामाने, शहजाद भाई,विशाल उथळकर आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे.
दरम्यान, ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या प्रश्नावर आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका न घेतल्यास मनसेच्या आंदोलनामुळे हा विषय अधिक चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देऊळगाव राजाचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणी नागरिकांमधूनही होत आहे.

