Onion forty fire : पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या दिग्रस खुर्द येथे शेतकरी विश्वनाथ बरडे यांच्या कांदा साठवणूक चाळीस अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आगीत लाखो रुपयांचा कांदा व शेती साहित्य जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

तोंडाशी आलेला घास हिरावला! आगीत कांदा साठा भस्मसात; शेतकरी आर्थिक संकटात
राहुल सोनोने
दिग्रस बुद्रुक : पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या दिग्रस खुर्द येथे शेतकरी विश्वनाथ बरडे यांच्या कांदा साठवणूक चाळीस अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आगीत लाखो रुपयांचा कांदा व शेती साहित्य जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ बरडे यांनी त्यांच्या शेतातील सुमारे २५० क्विंटल कांदा चाळीत साठवून ठेवला होता. तसेच त्या ठिकाणी स्प्रिंकलरचे दोन संच, पाण्याची टाकी व शेती मशागतीसाठी लागणारे अन्य साहित्य ठेवण्यात आले होते. आगीत कांद्यासह सर्व साहित्य जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल अधिकारी वैभवी रौंदळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्याचा अहवाल तहसीलदार राहुल वानखडे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
या आगीत तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बरडे कुटुंब गंभीर आर्थिक संकटात सापडले आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन शेतकरी विश्वनाथ बरडे यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

