Buldhana District Tops :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेच्या निकालात बुलढाणा जिल्हा विभागात अव्वल आला आहे. जिल्ह्याचा निकाल ९३.९५ टक्के एवढा लागला आहे. बारावीच्या निकालातही जिल्हा विभागात अव्वल आला होता.

सिंदखेडराजा तालुका ठरला जिल्ह्यात प्रथम; नांदुरा तालुक्याचा निकाल सर्वात कमी
बुलढाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेच्या निकालात बुलढाणा जिल्हा विभागात अव्वल आला आहे. जिल्ह्याचा निकाल ९३.९५ टक्के एवढा लागला आहे. बारावीच्या निकालातही जिल्हा विभागात अव्वल आला होता.
जिल्ह्यात ही परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षेसाठी एकूण ४० हजार ३८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ३९ हजार ६७८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले. यामधून ३७ हजार २८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.९५ टक्के लागला आहे.
निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. मुलांचा निकाल ९२.३४ टक्के लागला असून मुलींचा निकाल तब्बल ९५.९६ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. तालुकानिहाय निकालात सिंदखेडराजा तालुका ९७.६७ टक्के निकालासह जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहिला. त्याखालोखाल बुलढाणा तालुक्याचा ९६.७१ टक्के, देऊळगाव राजा ९६.६१ टक्के आणि चिखली तालुक्याचा ९६.२२ टक्के निकाल लागला आहे. तर नांदुरा तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८९.३६ टक्के नोंदविण्यात आला.
मेहकर तालुक्याचा निकाल ९४.५६ टक्के, मलकापूर ९२.५३ टक्के, खामगाव ९२.४२ टक्के, मोताळा ९१.८२ टक्के, शेगाव ९१.५९ टक्के, संग्रामपूर ९०.५५ टक्के आणि जळगाव जामोद तालुक्याचा निकाल ९०.४८ टक्के लागला आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या यशस्वी निकालाबद्दल शिक्षण विभागाने विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच पालकांचे अभिनंदन केले आहे. जिल्ह्याने विभागात अव्वल स्थान मिळवल्यामुळे शिक्षण क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बारावीच्या निकालातही बुलढाणा जिल्हा होता अव्वल
अमरावती विभागात इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकाला बुलढाणा जिल्ह्याची दमदार कामगिरी राहीली आहे. बारावीच्या निकालात जिल्ह्याने 95.22 टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला होता. तर दहावीच्या निकालातही जिल्हा विभागात प्रथम आला आहे. अमरावती जिल्हा 90.96 टक्यांसह दहावीच्या निकालात विभागात दुसरा, अकोला जिल्हा 90.74 टक्के तिसरा, यवतामाळ जिल्हा 88.38 चौथा आणि वाशिम जिल्हा 88.04 टक्यांसह शेवटच्या क्रमांकावर आहे.

