Kharif Season Imminent; खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. शासनाने मातोश्री पाणंद रस्ते विकास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे जाळे सुधारल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात बाळापूर तालुक्यातील अनेक शेतरस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे, शेतरस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पावसाळ्यात समस्या आणखी वाढणार ; तातडीने दुरुस्तीची मागणी
बाळापूर : खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. शासनाने मातोश्री पाणंद रस्ते विकास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे जाळे सुधारल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात बाळापूर तालुक्यातील अनेक शेतरस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे, शेतरस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बाळापूर महसूल परिसरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतरस्त्यांची समस्या कायम आहे. पावसाळ्यात बहुतांश शेतरस्त्यांवर चिखल साचत असल्याने ये-जा करणे कठीण होते. काळबाई शिवारातील बाळापूर–पळशी शेतरस्ता, बाळापूर–बटवाडी जुना रस्ता, बाभुळखेड शिवारातील लाखनवाडा रोड ते महेश नदी मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ते पिवळ्या नाल्यातून जाणारा रस्ता, क्रीडा संकुल ते जुना लासुरा रस्ता, गाझीपूर–शेगाव मार्ग, तसेच कासारखेड, शेळद आणि व्याळा परिसरातील अनेक शेतरस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही सुधारणा झालेली नाही.
या रस्त्यांवर मुरूम टाकणे, पाणी निचरा व्यवस्था, खडीकरण किंवा काँक्रिटीकरण अशी कोणतीही कामे झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचतो. अनेकदा वाहने चिखलात अडकतात, तर पायदळ जाणेही अवघड होते. परिणामी शेतकऱ्यांना कधी बैलगाडीतून, तर कधी डोक्यावर खते, बियाणे आणि शेतीची अवजारे घेऊन शेतात जावे लागते.
बाभुळखेड येथील शेतकरी अशोक उमाळे यांनी सांगितले की, “शेतरस्ता नसल्यामुळे पिवळ्या नाल्यातून ट्रॅक्टर वळवता येत नाही. चाके चिखलात अडकतात. पावसाळ्यात शेतात जाणे कठीण होते. माल बाहेर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. शासनाने तातडीने दुरुस्ती करावी.”
स्थानिक नागरिक डॉ. सिराज खान उमरदराज खान यांनी सांगितले की, “२०१४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष मोहिमेत शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बाळापूर ते जुना पळशी मार्ग तयार केला; मात्र त्यानंतर साधे खडीकरणही झाले नाही. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.”
या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, तूर आणि कापूस या खरीप पिकांची लागवड करतात. मात्र बियाणे, खते आणि औषधे शेतात नेण्यासाठी शेतरस्त्यांची दुरवस्था मोठा अडसर ठरत आहे. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत असून, काही भागांत बैलगाडी किंवा दुचाकी वापरणेही शक्य होत नाही.
खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना प्रशासनाने शेतरस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

