MLA Randhir Savarkar :आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची कोणतीही कमतरता भासू नये, तसेच मुबलक उपलब्धता सुनिश्चित करावी, अशा स्पष्ट सूचना अकोला (पूर्व) मतदारसंघाचे आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी दिल्या.

खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत विविध विषयावर चर्चा
संजय तायडे
अकोला : आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची कोणतीही कमतरता भासू नये, तसेच मुबलक उपलब्धता सुनिश्चित करावी, अशा स्पष्ट सूचना अकोला (पूर्व) मतदारसंघाचे आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी दिल्या.
तालुका कृषी अधिकारी, अकोला यांच्या वतीने नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, या हंगामावरच त्यांच्या कुटुंबाचा वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यामुळे खते, बियाणे आणि कृषी सेवांचा पुरेसा साठा ठेवून नियोजन करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
या आढावा बैठकीला कृषी उपसंचालक हरीश देशमुख, आत्माचे उपसंचालक डॉ. प्रेमसिंग मारग, डॉ. तुषार जाधव, गटविकास अधिकारी जयश्री पटोकार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. प्रकाश घाटोळ, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, आत्मा समितीचे अध्यक्ष जय पाटील ठोकळ, तालुका अध्यक्ष राजेश बेले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, बँक प्रतिनिधी, महाबीजचे अधिकारी आणि कृषी केंद्र संचालकही उपस्थित होते.
आढावा बैठकीत आमदार सावरकर यांनी संभाव्य पेरणी क्षेत्रानुसार युरिया, डीएपीसह विविध रासायनिक खतांचा आणि दर्जेदार बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले. यासोबतच बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई, पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी, नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित क्षेत्राचा आढावा, रोजगार हमी योजना, फळबाग लागवड, नैसर्गिक शेती आणि आत्मा योजनेचा प्रभावी वापर यावरही भर देण्यात आला. विशेषतः कापूस व सोयाबीन पिकांच्या पेरणी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून गावस्तरावरील कृषी यंत्रणेने प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. या संदर्भात तालुकास्तरावरील सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी तसेच कृषी विभागातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट 2.0 अंतर्गत येळवण येथील सद्गुरू पाणलोट शेतकरी गटाच्या अध्यक्ष व सचिवांना औजारे बँकेचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार रणधीर सावरकर व मान्यवरांच्या हस्ते ‘सोयाबीन लागवड तंत्र’ व ‘हुमणी अळी व्यवस्थापन’ या शेतीविषयक घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पीपीटी सादरीकरण तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी केले. बैठकीस कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्र व्यवस्थापक, बँक अधिकारी, महाबीज प्रतिनिधी आणि विविध विभागांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

