RTE Admission Lottery :बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत खाजगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी सन २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेतील लॉटरी ६ एप्रिल रोजी काढण्यात आली. या प्रक्रीयेत बुलढाणा जिल्ह्यात २ हजार ८०१ बालकांची निवड करण्यात आली आली आहे. निवड यादी व प्रतीक्षा यादी १० एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १० ते २० एप्रिल २०२६ दरम्यान प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत.

पालकांना २० एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत : जिल्हाभरातून ६ हजार १७१ बालकांचे आले होते अर्ज
बुलढाणा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत खाजगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी सन २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेतील लॉटरी ६ एप्रिल रोजी काढण्यात आली. या प्रक्रीयेत बुलढाणा जिल्ह्यात २ हजार ८०१ बालकांची निवड करण्यात आली आली आहे. निवड यादी व प्रतीक्षा यादी १० एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १० ते २० एप्रिल २०२६ दरम्यान प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात यंदा एकूण २२६ शाळांमधील २,९३३ जागांसाठी ६,१७१ अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांमधून २,८०१ विद्यार्थ्यांची नियमित निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो पालकांचे लक्ष आता प्रवेश पडताळणी आणि अंतिम प्रवेश प्रक्रियेवर लागले आहे. शिक्षण विभागाकडून निवड झालेल्या बालकांच्या पालकांना १० एप्रिलपासून SMS द्वारे सूचना पाठविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, केवळ SMS वर अवलंबून न राहता पालकांनी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज क्रमांक टाकून आपल्या पाल्याच्या प्रवेशाची स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत पोर्टलवर निवड, प्रतीक्षा आणि पडताळणीची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.
पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी समितीकडे हजर राहून शाळेत प्रवेश अंतिम करणे बंधनकारक आहे. मुदतीत प्रवेश न घेतल्यास जागा प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना देण्यात येऊ शकते. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता, पत्त्याचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, जन्मदाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार ठेवण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र बालकांना या प्रक्रियेचा लाभ मिळावा, यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर मदत केंद्र कार्यरत ठेवण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी पालकांनी शिक्षण विभागाच्या प्राथमिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील यांनी केले आहे.

