Shailesh Savji: नामस्मरणाने भक्तीभाव निर्माण होतो, भक्तीभावाने सदाचार राहतो आणि सदाचाराने गावात आनंदाची निर्मिती होते, असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी सांगितले.

शेलगाव देशमुख येथील मारुती मंदिर मठ संस्थानमध्ये भागवत सप्ताह
डोणगाव : नामस्मरणाने भक्तीभाव निर्माण होतो, भक्तीभावाने सदाचार राहतो आणि सदाचाराने गावात आनंदाची निर्मिती होते, असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी सांगितले.
शेलगाव देशमुख येथील मारुती मंदिर मठ संस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भागवत सप्ताह सोहळ्याला यंदा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. संपूर्ण सप्ताहभर विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर भारावून गेला. गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सप्ताहाचा लाभ घेतला.दि. 9 एप्रिल रोजी सप्ताहानिमित्त विशेष पूजाअर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजाविधीचे औचित्य साधून जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांच्या हस्ते विधीवत पूजाअर्चा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
सप्ताहादरम्यान भागवताचार्य नवले महाराज यांनी श्रीमद्भागवत महापुराणाचे सखोल व प्रभावी वाचन करून उपस्थितांना धर्म, नीती, भक्ती व जीवनमूल्यांचे मार्गदर्शन केले. त्यांच्या ओजस्वी वाणीतून भागवत कथा ऐकताना भाविक मंत्रमुग्ध झाले होते. तसेच ह.भ.प. हरि चैतन्य महाराज (पळसखेड) यांच्यासह विविध मान्यवर संत-महात्म्यांनी दररोज प्रवचनांच्या माध्यमातून अध्यात्मिक विचारांची जागृती केली. या सप्ताहात दररोज भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांमुळे गावात भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः युवकवर्गानेही या धार्मिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, ही बाब उल्लेखनीय ठरली. सप्ताहाची सांगता सत्तू महाराज (कष्टे) यांच्या काल्याच्या कीर्तनाने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. त्यांच्या कीर्तनातून भक्ती, समाजजागृती व नैतिक मूल्यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. कीर्तनावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
संपूर्ण सप्ताहादरम्यान गायनाचार्य भागवत महाराज देशमुख यांनी आपल्या मधुर आवाजात भजन-कीर्तन सादर करून कार्यक्रमात रंग भरला. मृदुंगाचार्य निलेश महाराज बनसोडे यांनी तालबद्ध साथ देत वातावरण अधिक भक्तिमय केले. तसेच टाळकरी व विनाकरी यांच्या योगदानामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी व आकर्षक झाला. या सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मठ संस्थानचे माधवराव कड्डक यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळाने नियोजनबद्ध पद्धतीने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन, व्यवस्था व शिस्त उत्तम राखण्यात आली होती.
तसेच महाप्रसादाचे अत्यंत सुयोग्य व नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात आले. यासाठी विनोद गोरे (उपसरपंच, शेलगाव), महादेव कड्डक शुभम मळेकर गजानन नरवडे शेषराव खराट विलास कड्डक सुमित कड्डक गोपाल गायकवाड गणेश तोतरे गणेश काळे संतोष कष्टे तसेच गावातील युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने व जबाबदारीने कार्य केले. भाविकांसाठी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची सोय आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या धार्मिक सप्ताहामुळे गावात एकात्मता, सामाजिक बांधिलकी व भक्तीभाव अधिक दृढ झाला असून ग्रामस्थांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. पंचक्रोशीतील अनेक भाविकांनीही या सप्ताहात सहभागी होत आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला.

