Satypal Maharaj : आज महिला बुवाबाजी आणि ढोंगी बाबा यांच्या आहारी गेल्या आहेत . जो पर्यंत महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मूलन होणार नाही तोपर्यंत आपला समाज सुधारणार नाही, असे प्रबोधन सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी केले .

साखरखेर्डा : आज महिला बुवाबाजी आणि ढोंगी बाबा यांच्या आहारी गेल्या आहेत . जो पर्यंत महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मूलन होणार नाही तोपर्यंत आपला समाज सुधारणार नाही, असे प्रबोधन सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी केले .
७ एप्रिल रोजी महाकालेश्वर मंदीर परिसरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रबोधनपर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यातून महाराज प्रबोधन करीत होते. ते म्हणाले की , मुलं होत नाही म्हणून महाराज , पती सुख देत नाही म्हणून महाराज , संपत्ती हवी म्हणून महाराज ह्या गोष्टी जर महाराज आणि बाबा यांच्या हाती असत्या तर लग्न करायची गरजच काय ! हा सर्व ढोंगीपणा सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात नावाचा बाबा महिलांसोबत काय काय चाळे करत होता . हे सगळे आपण पाहतो . महिलांनी ढोंगी बाबा आणि महाराज यांच्या पासून सावध राहिले पाहिजे . त्यांच्या जवळ कोणत्याही प्रकारची योग सिध्दी प्राप्त नव्हती , आणि नाही . जर योग सिध्दी करुन मुले झाली असती तर पती करायची , लग्न करायचे कशाला ! मुलं होण्यासाठी संसार हा सुखाचा हवा असतो . बाबाकडे जाऊन मुले कधीच होत नसतात . अशोक खरात हा तर स्वतः चे मुत्र तिर्थ म्हणून पाजत होता. कोठे गेली आपली संस्कृती. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , माता रमाबाई यांनी आपल्याला भोंदू बाबाच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी त्याग केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम आरक्षण हे ओबीसी समाजाला मिळवून दिले . नंतर दलित समाजाला हे उपकार त्यांचे विसरुन चालणार नाही. संत तुकाराम , संत गाडगेबाबा बाबा , तुकडोजी महाराज , संत सावता माळी यांच्यासह बहूजन समाजातील संतांनी खरी सत्यशोधक चळवळ सुरू केली आणि आपल्याला ब्राह्मणवादी जोखडातून मुक्त केले. आजही आपण कोणतेही कार्य करताना अगोदर त्यांना विचारतो . ते धंदे बंद करा , कारण आपल्या मनगटावर दम असेल तर कोणत्याही गोष्टीला सामोरे जाऊ शकतो . सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह करा . विवाह सोहळ्यात अनाठायी खर्च टाळा , बाप मेल्यानंतर तेरस घालण्यापेक्षा तो जिवंत असे पर्यंत त्याची सेवा करा . आई वडील हेच आपले विठ्ठल आणि रुख्मिणी आहेत . हे विसरून चालणार नाही .
हिंदू खतरेमे है , मुस्लिम खतरेमे है ! हे आज फक्त राजकारणासाठी सुरू आहे . या देशात कोणीच खतरेमे नाही . तर राजकीय नेते खतरेमे है ! कोणत्याही धर्म ग्रंथात कोणत्याही समाजाविषयी तेढ निर्माण करण्याचे सांगितले नाही . त्यासाठी सर्वांनी मिळून मिसळून राहून एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवा . यातच आपली , आपल्या देशाची प्रगती आहे . असे प्रबोधन सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी केले . कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले मंडळ , सावता गृप यांच्या वतीने करण्यात आले . संचालक वैशिष्ट्य खरात यांनी केले . तर सर्व प्रथम सत्यपाल महाराज यांचे स्वागत दिलीप बेंडमाळी , संतोष मंडळकर यांनी केले होते .

