Kisan Samman Nidhi subsidy : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दोन हजार रुपयांच्या अनुदानापासून तालुक्यातील अनेक शेतकरी विविध तांत्रिक कारणांमुळे वंचित राहत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

ज़ाकिर अहमद
बाळापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दोन हजार रुपयांच्या अनुदानापासून तालुक्यातील अनेक शेतकरी विविध तांत्रिक कारणांमुळे वंचित राहत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.
याबाबत शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोहरे यांनी बाळापूर येथील तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.
मात्र, विविध तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पडताळणी, बँक खात्यांमधील त्रुटी तसेच ऑनलाइन प्रक्रियेतील अडथळे यांमुळे तालुक्यातील जवळपास ३० टक्के शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर अनुदानाचा लाभ मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

