Ghongadi Baithak :पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या दिग्रस बुद्रुक येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत आयोजित घोंगडी बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शुक्रवार (दि. २७ मार्च) सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या बैठकीत शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

महसूल प्रशासनाचा गावपातळीवर संवाद; घोंगडी बैठकीत शेतकऱ्यांचा मोठा सहभाग
राहुल सोनोने
दिग्रस बुद्रुक : पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या दिग्रस बुद्रुक येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत आयोजित घोंगडी बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शुक्रवार (दि. २७ मार्च) सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या बैठकीत शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
तहसीलदार डॉ. राहुल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीस नायब तहसीलदार अजय तेलगोटे प्रमुख उपस्थित होते. यावेळी मंडळ अधिकारी नरेंद्र बडेरे आणि ग्राम महसूल अधिकारी डी. के. देशमुख यांनी विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
घोंगडी बैठकीत आयुष्यमान भारत योजना, एकल महिला योजना, पानंद रस्ते, शेतकरी ओळखपत्र तसेच इतर महत्त्वाच्या शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे ग्रामस्थांना त्यांच्या हक्काच्या योजनांची माहिती मिळून त्याचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनाने गावपातळीवर येऊन नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनीही विविध प्रश्न उपस्थित करत त्यावर मार्गदर्शन घेतले. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यास मदत झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी नरेंद्र बडेरे, ग्राम महसूल अधिकारी डी. के. देशमुख, महसूल सेवक कपिल ताले यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच डॉ. राजेंद्र ताले, अनंता ताले, भीमराव अंभोरे, गोपाल गवई, पोलीस पाटील नितीन गवई यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांना चालना मिळाल्याचे चित्र दिसून आले. गावपातळीवरील अशा संवादात्मक बैठका भविष्यातही नियमितपणे घेण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

