Funding Assurance :नगरपरिषद निवडणुकीनंतर शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर राजकीय हालचालींना वेग आला असून, सत्तारूढ गटाने आता थेट राज्यस्तरावर दबाव वाढवण्याची रणनीती अवलंबल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत देऊळगाव राजासाठी मोठ्या विकासनिधीची मागणी केली.

मनोज कायंदेंच्या पुढाकाराला बळ; मुंबईतून विकासाला गती देण्याचे संकेत
गजानन तिडके
देऊळगाव राजा : नगरपरिषद निवडणुकीनंतर शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर राजकीय हालचालींना वेग आला असून, सत्तारूढ गटाने आता थेट राज्यस्तरावर दबाव वाढवण्याची रणनीती अवलंबल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत देऊळगाव राजासाठी मोठ्या विकासनिधीची मागणी केली.
या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी “देऊळगाव राजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,” असे ठाम आश्वासन देत स्थानिक राजकारणात स्पष्ट संदेश दिला. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाचा मुद्दा आक्रमकपणे पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शहरवासीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दाखवलेल्या विश्वासाचा उल्लेख करत, शिष्टमंडळाने दिवंगत अजित पवार यांनी दिलेल्या ‘विकासाची गंगा आणू’ या आश्वासनाची आठवण करून दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी “तो शब्द वाया जाऊ देणार नाही,” असे सांगत राजकीय बांधिलकी अधोरेखित केली.
या भेटीत पालकमंत्री मकरंद पाटील यांचीही उपस्थिती होती. नगराध्यक्ष माधुरी शिपने, उपाध्यक्ष वनिता भुतडा, गटनेते प्रदीप वाघ यांच्यासह सत्तारूढ गटातील नगरसेवकांनी विविध विकास प्रकल्पांचे प्रस्ताव सादर केले.
बैठकीत भुयारी गटार योजना, शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, अंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम, सुसज्ज सांस्कृतिक भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तसेच अभ्यासिका उभारणी यांसारख्या महत्त्वाच्या कामांवर सविस्तर चर्चा झाली. मंजूर योजनांसाठी उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
राजकीय विश्लेषकांच्या मते, नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांची संयुक्त सत्ता असली तरी विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आघाडी घेत असल्याचे या हालचालीतून स्पष्ट होते. आमदार मनोज कायंदे यांनी आतापर्यंत कोट्यवधींचा निधी खेचून आणण्यात यश मिळवले असल्याचा दावा सत्तारूढ गटाकडून करण्यात येत आहे, तर विरोधकांकडून या आश्वासनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. विकासनिधीच्या आश्वासनातून मतदारांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
एकूणच, देऊळगाव राजा शहराच्या विकासासाठी मोठ्या निधीची हमी मिळाल्याने सत्तारूढ गटाला राजकीय बळ मिळाले असले, तरी या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी आणि कितपत होते, यावरच आगामी राजकीय समीकरणे ठरणार आहेत. नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, आता आश्वासनांचे वास्तवात रूपांतर होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

